नाशिक : भूजल पातळी दिवसेंदिवस खोलवर जात असताना खासगी व्यक्तींकडून पाण्यासाठी दोनशे ते तीनशे फुटापर्यंत बोअर खणून पाण्याचा उपसा केला जात असल्याने यापुढे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अनुमतीशिवाय बोअरवेल केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. जिल्ह्यात बोअरवेल करण्यासाठी परवानगी देण्याबाबत भूजल खात्याने कानावर हात ठेवले असून, ज्या ठिकाणी भूजल पातळी धोकेदायक परिस्थितीत खाली गेली असेल त्याठिकाणी बोअरवेल घेण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच सार्वजनिक वापराच्या विहिरींपासून पाचशे मीटर अंतरावर बोअरवेल करता येणार नाही, असे मोघम निकष बोअरवेलच्या खणण्याबाबत असल्याने जिल्ह्यात खासगी व्यक्तींना हवे तेथे व हव्या तितक्या बोअरवेल केल्या आहेत. बोअरवेल करणारे अनेक परप्रांतीय मजूर साहित्यानिशी शहर व ग्रामीण भागात फिरत असून, बोअरला पाणी लागेपर्यंत शेकडो फूट खोल खणत आहेत. त्याबाबत कोणतीही माहिती महसूल, भूजल विभागाकडे नसल्याची बाब चर्चेत आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना खुलासा केला. जिल्ह्यात बोअरवेल करणाऱ्यांकडूनच त्याची माहिती मागविता येईल काय, अशी चाचपणी सुरू करण्यात आली असून, बोअरवेल करण्याबाबत परवानगी देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बोअरवेलसाठी यापुढे परवानगी आवश्यक
By admin | Updated: March 23, 2016 01:04 IST