वणी : महाराष्ट्र व गुजरात राज्यामधील तांदुळाचे काळ्या बाजारातील कनेक्शन पोलिसांनी उघडकीस आणून छत्तीस हजार पाचशे किलो तांदूळ जप्त केला. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ कोठून आला, हे तपास करण्याचे काम पोलिसांचे असले तरी पुरवठा विभागानेही या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे. प्रत्यक्षात पुरवठा विभाग मात्र मूग गिळून बसल्याचे चित्र दिसत आहे.पोलीस उपअधीक्षक सचिन गुंजाळ व वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद खोडवे यांनी केलेल्या कामगिरीत १८ लाख १३ हजार ८५० रुपयांचा ऐवज जप्तीच्या कारवाईनंतर पोलिसांनी या घटनेच्या चौकशीस आरंभ केला आहे. मराठवाडा भागातील बीड जिल्हा ते नगर जिल्हा व आता नाशिक जिल्ह्यापर्यंत या व्यवसायाचे धागेदोरे सापडण्यासाठी पोलीस यंत्रणेने अग्रक्रम दिला आहे. दरम्यान, तांदुळाच्या जप्तीचा आकडा बघितल्यास काळा बाजार करणाऱ्या संशयितानी एवढा तांदूळ आणला कोठून, असा प्रश्न यंत्रणेला पडला असला तरी पुरवठा विभागानेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व बाबींचा लेखाजोगा व काळ्या बाजाराचे प्रमाण याचा समन्वय भल्याभल्यांना विचार करावयास लावणारा असून, नमूद घडलेल्या काळ्या बाजाराच्या दोन घटनांमध्ये पुरवठा विभागाचा वचक काहीसा कमी झाल्याचे दिसून येत असल्याने अशा घटकांना अनुकूल काळ आल्याचे पुढे आले आहे. ट्रकचालकाला मोठी बक्षिसे, ट्रकमालकाला दुपटीने वाहतूक भाडे व काळ्या बाजार करणाऱ्या घटनांकडून सुरक्षिततेची हमी अशा तिहेरी कार्यप्रणालीमुळे निर्धास्त व बिनधास्त असा व्यवसाय करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. गुजरात राज्यातील नवसारी हे रेशन तांदूळ पॉलिशचे मुख्य केंद्र असून, यामुळे हे शहर परिचित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तांदूळ प्रकरणात दोन फरार संशयितांचा शोध लागल्यानंतर अनेक मोठे मासे यात अडकण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)