कळवण : कांदा कवडीमोल भावाने विकला जात असून, उत्पादन शुल्कदेखील वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी कळवण येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीवर बुधवारी (दि. २४) राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने कांदा फेको आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमाण वाढले आहे. दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ६३ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून कांद्याला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिरे यांनी यावेळी केली. यापूर्वीदेखील या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यात रास्ता रोको व अन्य आंदोलने करण्यात आली. परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला जाग येत नसून शेतकऱ्यांची कीवसुद्धा येत नसल्याने सरकार कांद्याबाबत काहीही निर्णय घेत नाही, असा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसने केला आहे.भाजपा-शिवसेना युती सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करून दिलासा द्यावा या मागणीसाठी आज बुधवारी कोल्हापूर फाटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कांदा फेको आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे, कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार, पंचायत समितीचे उपसभापती अॅड. संजय पवार, पंचायत समिती सदस्य हिरामण पगार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष अलकाताई कनोज, नगरसेवक जयेश पगार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार, पांडुरंग पाटील, शेतकरी नेते महेंद्र हिरे, विलास रौंदळ, अमोल पगार, यशवंत देशमुख, सुभाष शिरोडे, कौतिक गांगुर्डे, भाऊसाहेब पवार, पंकज पाचपिंड, पंकज जाधव, आशुतोष अहेर, मनोहर बोरसे, सनी बोरसे, उमेश सोनवणे, सागर खैरनार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
राष्ट्रवादी काँग्रेसचे कांदा फेको आंदोलन
By admin | Updated: August 24, 2016 22:13 IST