नाशिक : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांतील उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक बापूसाहेब भुजबळ यांनी केले. राष्ट्रवादी भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार होते. यावेळी माजी मंत्री तुकाराम दिघोळे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, माणिकराव शिंदे, दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, प्रकाश नन्नावरे, श्रीराम शेटे, डॉ. भारती पवार, कोंडाजीमामा आव्हाड, महिला जिल्हाध्यक्ष शोभा मगर, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पिंगळे, शहराध्यक्ष छबू नागरे, दीपक वाघ, प्रेरणा बलकवडे आदि उपस्थित होते. उद्या गुरुवारीही चार मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.यावेळी भुजबळ पुढे म्हणाले की, माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय घेतले ते निर्णय आता केंद्रातील सत्ताधारी पक्ष घेताना दिसत नाही. कोणतेही ठोस निर्णय न घेता महागाई कमी करण्याच्या दृष्टीने मोदी सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. मतदारसंघनिहाय घेण्यात आलेल्या बैठकीत देवळाली मतदारसंघ, मालेगाव बाह्य, सिन्नर, बागलाण, नाशिक पश्चिम या मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. यावेळी मतदारसंघनिहाय इच्छुक उमेदवारांनी आपली बाजू मांडली. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील लेखाजोगा मांडत विविध सूचनाही मांडल्या. विधानसभा मतदारसंघ निहाय इच्छुकांनी मुलाखती दिल्या. त्यावेळी प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले, जनकल्याण बॅँकेचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष कविता कर्डक, नगरसेवक शिवाजी चुंबळे, हरिष भडांगे, रामदास सदाफुले, भगवान दोंदे, दीपक वाघ, सुनील कोथमिरे, रविकिरण घोलप, रतन काळे, राजेंद्र भोसले, संदीप लोंढे, बंडूनाना भाबड, बाळासाहेब सोनवणे, छबू नागरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)