नाशिक : राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत धनादेश न वटणे, मोटार अपघात, बँक वसुली आदि प्रकरणांमध्ये तीन कोटी १९ लाख ८६ हजार ३०४ रुपये नुकसानभरपाई व दंडापोटी वसूल करण्यात आले़ या राष्ट्रीय लोकअदालतीत दाखल करण्यात आलेले प्रलंबित तसेच दावा दाखलपूर्व ११ हजार ७४ प्रकरणांपैकी ८९५ प्रकरणांचा यावेळी निपटारा करण्यात आला़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण एम. ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते़ राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्हा न्यायालयासह तालुका न्यायालयात प्रलंबित चार हजार ६९९ प्रकरणांपैकी ५४४ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन दंडापोटी दोन कोटी ७९ लाख ५२ हजार ६६३ रुपये, तर दावा दाखलपूर्व ६ हजार ३७५ प्रकरणांपैकी ३५१ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन ४० लाख ३३ हजार ६४१ रुपये वसूल झाले़ या अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या कौटुंबिक ५०१ पैकी ३४ प्रकरणांवर यशस्वी तोडगा काढण्यात आला़ न्यायालयातील प्रलंबित २ हजार २८ फौजदारी दाव्यांपैकी २९५ दावे निकाली काढून दंडापोटी ३ लाख ७७ हजार ७५० रुपये, धनादेश न वटल्याच्या १ हजार २१० प्रकरणांपैकी १२० दावे निकाली काढून दंडापोटी एक कोटी ३६ हजार १३६, बँक वसुलीच्या २१३ प्रकरणांपैकी ९ वसुलीचे दावे निकाली काढून दोन लाख ८८ हजार ७९३ रुपये, मोटार अपघाताच्या २४० प्रकरणांपैकी ५७ प्रकरणे निकाली काढून दंडापोटी १ कोटी ७० लाख ५७ हजार १४ रुपये, कामगार न्यायालयातील २९ प्रकरणांपैकी ६ प्रकरणे निकाली काढून दंडापोटी १ लाख ९२ हजार ९७० रुपये, जमीन अधिग्रहणाच्या ७१ दावे ठेवण्यात आले, मात्र त्यावर तोडगा निघाला नाही़ इतर ४०७ दिवाणी दाव्यांपैकी २३ दावे निकाली काढण्यात आले़ या लोकअदालतीमधील दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी जिल्हा व तालुका न्यायालयामध्ये विविध पॅनल्स तयार करण्यात आले होते़ जिल्हा न्यायालयात झालेल्या लोकअदालतीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव वि. र. अगरवाल, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्यासह न्यायिक अधिकारी, वकील, पक्षकार व जिल्हा न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
राष्ट्रीय लोकअदालतीत तीन कोटींची नुकसानभरपाई
By admin | Updated: April 10, 2017 01:52 IST