’नाशिक : मेळघाटमधील दुर्गम आदिवासींच्या हातांना अधिकाधिक रोजगार मिळावा, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मविप्रचे एमबीएचे विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. संपूर्ण बांबू केंद्रात आदिवासींनी बनविलेल्या राख्यांची नाशिकच्या बाजारपेठेत विक्री करत सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न या केंद्राला विद्यार्थ्यांनी यावर्षी मिळवून दिले.ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एमबीएच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही बांबूंच्या पर्यावरणूपरक राख्या नाशिकच्या बाजारपेठेत विकल्या. एमबीए विभागाचे विभागप्रमुख डी. टी. खैरनार, डॉ. एस. आर. पाचोरकर यांनी ‘प्रोजेक्ट बंधन’ हातात घेतले आहे. संस्थेचे तिसरे वर्ष असून, यावर्षी विद्यार्थ्यांनी शहरातील मेनरोड, गंगाघाट, सोमेश्वर मंदिर, कपालेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, एमजीरोड, सिटी सेंटर मॉल, दहीपूल आदि परिसरात स्टॉल्स लावून बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्यांच्या विक्रीचा ‘सोशल टास्क’ पूर्ण केला. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य, विपणनशास्त्र आदि बाबींचा विकास व्हावा आणि आदिवासींच्या हस्तकलेला अधिकाधिक चालना मिळावी, या उदात्त हेतूने प्रोजेक्ट बंधन राबविले जात आहे, अशी माहिती खैरनार यांनी यावेळी दिली. वेणू शिल्पी औद्योगिक संस्थेच्या संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्ष निरुपमा देशपांडे यांना एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दोन लाख दोन हजार ४०२ रुपयांचा धनादेश संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तीन वर्षांमध्ये एकूण ४ लाख ७८ हजार रुपयांचे उत्पन्न विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून आदिवासींना मिळवून दिले आहे.अनियमित रोजगारामुळे सातपुडा पर्वतरांगेचे अखेरचे टोक असलेले मेळघाट कुपोषित बालमृत्यूसाठी ओळखले जाते. मेळघाटची ही ओळख बदलण्यासाठी आदिवासींना कुशल कारागीर बनविण्याचा प्रयत्न २१ वर्षांपासून वेणू शिल्पी संस्था करत आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना किराणा मालाची यादीही लिहिता येणार नाही, इतक्या सुमार दर्जाचे शिक्षण आदिवासींना दिले जाते. नाशिकपासून सुरू झालेले ‘प्रोजेक्ट बंधन’ राज्यभर पोहचले याचा अभिमान असल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)