नांदगाव : शहरात अस्वच्छता व ढासळलेले पाणीपुरवठा नियोजन यामुळे शहराची आरोग्यव्यवस्था धोक्यात आली असून, डेंग्यूने एका बालकाचा मृत्यू झाला असल्याचा आक्षेप नांदगाव युवा फाउंडेशनने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात घेण्यात आला आहे. जनजागृती करण्यासाठी डेंग्यू रोगाची सविस्तर माहिती देणारे पत्रक छापून ते शहरात वाटण्याचा उपक्रमही फाउंडेशनने सुरू केला आहे.डेंग्यूची प्रजनन क्रिया स्वच्छ पाण्यात होत असते व पाणी साठविण्याशिवाय पर्याय नाही. नगरपालिकेकडे पाणीपुरवठ्याच्या दोन दोन (गिरणा व माणिकपुंज) योजना असून, नियोजनाचा अभाव असल्याने पाणीपुरवठ्याचे आवर्तन लांबणीवर पडते, असा युवा फाउंडेशनचा मुद्दा आहे. लेंडी नदीत साचलेल्या कचऱ्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बहुतांश भागात कचरागाडी व स्वच्छता कर्मचारी पोहोचत नाहीत. नगरपालिकेची कचरा नष्ट करण्याची जागा असून, त्यावर लाखो रुपये खर्च झाला आहे अस्वच्छतेमुळे मलेरिया व डेंग्यूसदृश आजारांमध्ये वाढ होत आहे. यावर पालिकेने त्वरित उपाययोजना करून नांदगावकरांचे आरोग्य रक्षण करावे, अशी मागणी युवा फाउंडेशनने केली आहे. निवेदनावर सुमित सोनवणे व विकास शर्मा यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)
नांदगाव शहरात अस्वच्छता
By admin | Updated: July 25, 2016 23:35 IST