नाशिक : हिंगणवेढे परिसरात महावितरणकडून अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाशिकरोड येथील महावितरणच्या विद्युत भवनावर मोर्चा काढून निवेदन दिले.महावितरण अर्बन दोनचे कार्यकारी अभियंता देवेंद्र सायनेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, हिंगणवेढे परिसरात कुठलीही पूर्वसूचना न देता दोन-तीन महिन्यांपासून वारंवार अघोषित भारनियमन केले जात आहे. यामुळे शेतकरीवर्गाचे हाल होत असून, पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील जनावरांचा चारा जळून गेला आहे. हिंगणवेढे परिसरात लाइनमन येत नसल्याने नवीन लाइनमनची नेमणूक करावी. गेल्या आठवड्यात वादळी पावसामुळे हिंगणवेढे व आजूबाजूच्या परिसरात जवळपास ५० हून अधिक विद्युत खांब जमीनदोस्त झाले होते. त्याचे दुरुस्तीचे काम अद्यापही पूर्ण न झाल्याने काही भागातील वीजपुरवठा अजूनही खंडितच आहे. विद्युत खांब उभारणीचे काम संबंधित ठेकेदाराकडून योग्यरीत्या होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. भारनियमन व इतर प्रश्न त्वरित न सोडविल्यास नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर कार्यकारी अभियंता सायनेरकर यांनी लागलीच महावितरणचे एक पथक हिंगणवेढे येथे पाहणीसाठी पाठविले. निवेदनावर गंगाधर धात्रक, वाल्मीक धात्रक, संपत धात्रक, दीपक धात्रक, संजय वाघ, बारकू धात्रक, रमेश धात्रक आदिंच्या सह्या आहेत. (वार्ताहर)