मालेगाव : शहरातील मोतीबाग नाका परिसरात धावत्या बसेसवर दगडफेक करून दंगल पेटविण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून छावणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. यात तीन बसेस आणि एक इंडिका कारच्या काचा फुटून नुकसान झाले.दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फेसबुकवर डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी औरंगाबाद येथे गुन्हा दाखल असून, त्याचे पडसाद शहरात उमटले. संगमेश्वरातील सावता चौकाच्या बाजूला दुपारी जमाव जमला. त्यातील काही लोकांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. पोलीस त्यांना समजावून सांगत असताना रस्त्यावरुन जाणाऱ्या बसेसवर दगडफेक झाली. त्यात भूषण राजेंद्र जाधव (वय २४, रा. महात्मा फुलेनगर, कलेक्टरपट्टा), शक्ती राजेश सौदे (वय ३२, रा. माळीनगर) व मच्छिंद्र गोविंद शिर्के (वय २६, रा. नवदुर्गानगर कलेक्टरपट्टा) या तिघांना पोलिसांनी दगडफेक करताना रंगेहाथ पकडून अटक केली. यात गॅरेजवर उभी असलेली इंडिका कार (क्र.एमएच ४१ सी २१५३), रावेर - ठाणे बस क्र. एमएच ३९०२, दोंडाईचा आगाराची मुंबई-अंमळनेर बस क्रमांक एमएच १२ बीएल २४०२, तर नाशिक दोंडाईचा बस क्रमांक एमएच १४ बीटी १३२५ हा वाहनांच्या काचा फुटल्याने नुकसान झाले. यात तिघा बसच्या काचा फुटल्याचे ४० हजारांचे नुकसान झाले.घटनेनंतर आमदार दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे प्रमोद शुक्ला, भाजपचे सुनील चौधरी, नाना मराठे, भरत पोफळे, रिपाइंचे दिपक निकम, भारत चव्हाण यांनी अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची छावणी पोलिसात भेट घेऊन चर्चा केली. शहरात व्यवहार सुरळीत सुरू असून कोणताही तणावाचे वातावरण नव्हते. शहरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान, दगडफेक प्रकरणी चालक रवींद्र रमेश पाटील यांनी छावणी पोलिसात फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक इंगळे करीत आहेत.