मनमाड : यापूर्वी शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी अडत आता व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गाचा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला संप मागे घेण्यात आला आहे. मनमाड येथील सगळे लॉन्समधे व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बाजार समित्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दि. ५ जुलै २०१६ रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला . त्या नुसार शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याचे ठरले. सर्वत्र व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले े.या निर्णयामुळे व्यापारी वर्गावर अन्याय होत असल्याचा आरोप करत बाजार समितीच्या आवारात लिलावाचे कामकाज बंद केले होते.त्या नंतर ही तोडगा न निघाल्याने अनेक बाजार समितींमधील व्यापाऱ्यांनी आपले परवाने बाजार समितीकडे जमा केले होते.चिघळेल्या या संपावर तोडगा काढण्यासाठी व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आलेली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीत शेतकऱ्याकडून आडत वसूल करू नये तसेच संप मागे घेउन लिलाव पुर्ववत सुरू करावे असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. बाजार समित्यांकडून जमा केलेले परावाने परत घेउन लिलाव सुरू करण्यात येणार आहे. यावेळी व्यापारी संघटनेचे मनमाड शहर अध्यक्ष रिखबचंद ललवाणी, शंकर नागरे, इंदरचंद चोपडा, संजय ललवाणी, प्रकाश बढे, नारायण गोंधळे, दादा चौधरी, पप्पू राका, सुरेश बोडके, पियूष सुराणा यांच्यासह जिल्हयातील व्यापारी उपस्थित होते. (वार्ताहर)
व्यापाऱ्यांचा संप मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2016 23:04 IST