मार्च अखेरची धावपळ दर वर्षी ठरलेली असली तरी गेल्या वर्षाचा कोरोनाचा अनुभव लक्षात घेता व यंदाही पुन्हा मार्च महिन्यात कोरोनाचा कहर वाढू लागताच त्याचा शासकीय कामांवर परिणाम होऊ नये म्हणून गेल्या महिन्यापासून जिल्हा परिषदेच्या विविध खात्यानी तयारी चालविली होती. विशेष करून बांधकाम व वित्त विभागात दिवसरात्र काम सुरू होते, त्यातच २०१९-२० या वर्षाच्या निधी खर्चाची मुदत देखील ३१ मार्च असल्याने साऱ्याच खात्याची धावपळ चालू होती. प्रतक्षात आर्थिक वर्ष संपण्याच्या आदल्या दिवशी याचा प्रत्यय आला. सर्वच विभाग प्रमुख जातीने उपस्थित होते तर जिल्हा परिषदेला किती निधी मिळतो यावर पदाधिकारी, सदस्य देखील लक्ष ठेवून होते. त्यामुळे दिवसभर जिल्हा परिषद गजबजून गेली होती. वर्षभर कामे केल्याने अखेरच्या दिवशी बिले मंजूर होतील या आशेने ठेकेदार देखील तळ ठोकून होते. रात्री पर्यंत काही विभागांना काही प्रमाणात निधी वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले तर गेल्या आठवड्यापासून जवळपास पाचशे कोटी रुपयांची देयके ट्रेझरी विभागात सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बुधवारी अखेरचा दिवस असल्याने अशीच गर्दी व धावपळ कायम राहणार आहे.
मार्च एंडची जिल्हा परिषदेत धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:15 IST