नाशिक : कोपर्डीच्या कन्येवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण व अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा, यासाठी नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी औरंगाबाद रोडवरील वरद विनायक लॉन्स येथे बैठक संपन्न झाली. मराठा समाजाच्या वतीने येत्या २४ सप्टेंबर रोजी मराठा क्रांती नावाने मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चाचे नियोजन बैठकीत करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्यावी, तसेच मराठा समाजातील नागरिकांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर जबरीने अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हे दाखल केले जातात व नंतर त्यांना ब्लॅकमेल केले जाते. इतर समाजाप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे असून, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डीसारखी घटना पुन्हा घडू नये, मराठा समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मराठा समाजाने एकत्रित येणे गरजेचे असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. बैठकीत उपस्थितांनी मोर्चासाठी व कोपर्डीतील अत्याचारित विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना मदत म्हणून देणग्या जाहीर केल्या. बैठकीत मविप्रच्या नीलिमा पवार, आमदार जयंत जाधव, आदिंसह मान्यवरांची भाषणे झाली. या नियोजन बैठकीला आमदार अपूर्व हिरे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे, शैलेश कुटे, अॅड. शिवाजी सहाणे आदि उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यात मराठा समाजाचा २४ रोजी मोर्चा
By admin | Updated: September 4, 2016 00:09 IST