अद्याप बेडची प्रतीक्षा कायम
नाशिक : शहरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊ लागला असला तरी अद्याप अनेक रुग्णांना बेड मिळणे मुश्कील झाले आहे. बहुतेक रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल असल्याने नव्या रुग्णांना बेडसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मनपा रुग्णालयांचीही तीच स्थिती आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांना सुट्या मिळणे कठीण
नाशिक : शहरात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. येथील कर्मचाऱ्यांना सुटी मिळणेही मुश्कील झाले आहे. सातत्याने वाढणाऱ्या कामामुळे हे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
बँकांमधील गर्दीवर परिणाम नाही
नाशिक : कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी शहरातील बँकांमधील गर्दी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक बँकांच्या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव आनखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजी विक्रेत्यांचे मास्ककडे दुर्लक्ष
नाशिक : भाजीविक्रेत्यांना सकाळी ११ वाजेपर्यंतच परवानगी असल्याने सकाळच्या वेळी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. काही विक्रेते मास्क वापराकडे दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अनेक मजूर झाले बेरोजगार
नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी पर्यटकांनी पर्यटन स्थळांकडे पाठ फिरविल्यामुळे या परिसरातील छोटे- मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. याठिकाणी काम करणाऱ्या अनेक मजुरांना बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. यामुळे त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
बेमोसमीमुळे शेतकऱ्यांची धावपळ
नाशिक : अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतित झाले आहेत. सध्या ग्रामीण भागात कांदा काढणी व साठवणुकीची कामे सुरू आहेत. अचानक येणाऱ्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडते. काढून ठेवलेला कांदा भिजू नये यासाठी ते झाकण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
ऑनलाइनवर होतेय आंब्याची विक्री
नाशिक : कोरोनामुळे बाजारपेठा बंद असल्याने ग्राहकांपर्यंत आंबा पोहोचविण्यासाठी उत्पादकांनी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला आहे. शहरातील अनेक व्यावसायिकांनी ऑनलाइन व्यवसाय सुरू केला असून त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोकणातील आंबा थेट घराघरात पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची थेट विक्री
नाशिक : बंदमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी किरकोळ स्वरूपात भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे विविध मार्गांवर शेतकऱ्यांची भाजीपाल्याची दुकाने दिसून येतात. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.