पाटोदा / मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, खडकीमाळ, देशमाने, मुखेड फाटा, मुखेड आदी परिसराला बुधवारी (दि. ८) मध्यरात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले.
परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहात असल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पावसाची संततधार सुरू होती. मात्र, बुधवारी मध्यरात्री जोरदार विजांच्या गडगडाटासह पावसाचा वेग वाढून मुसळधार पाऊस बरसला. रात्रीची वेळ असल्याने शेतकऱ्यांना पाणी साचण्याचा कोणत्याही प्रकारचा अंदाज आला नव्हता. सकाळ झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला असणारे दुतर्फा नाले ओसंडून वाहात होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यामुळे लागवड केलेली पिके खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजाच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या. काही ठिकाणी पिके काढणीसाठी थोडे दिवस राहिले आहेत. मात्र, काही परिसरातील पिके काढणीला येण्यासाठी अजून वेळ आहे. काही शेतातील सोयाबीन, मका, बाजरी, ज्वारी आदी पिकांना सध्या पावसाची अत्यंत गरज होती. पाऊस पडल्याने बळीराजा सुखावला असला तरी काही शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. संततधार झालेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाणी साचले असल्या कारणाने शेतातील पिके काहीशी खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
-------------------------
पेरण्या पूर्ण, तरीही पावसाची प्रतीक्षा
मानोरी परिसरात यंदा तब्बल महिनाभर उशिराने रिमझिम पावसाच्या भरोशावर खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या होऊनही येथील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागून होती. यंदाच्या मोसमातील हा पहिल्यांदाच बरसलेला मुसळधार पाऊस असून, या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. मका, सोयाबीन, टोमॅटो आदी पिकांच्या शेतातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात होते. या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विहिरी, बोअरवेल यांना पाणी उतरण्यास मोठी मदत होणार असल्याचे शेतकरीवर्गाकडून सांगण्यात आले आहे.
---------------
रस्ता जलमय
मानोरी गावालगत असलेला एक नाला मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहात होता. मानोरी बु. ते खडकीमाळ रस्त्यावरून या नाल्याचा प्रवाह प्रवाहीत झाल्यानंतर रस्ता जलमय झाला होता. या नाल्यालगत असलेल्या शेतकऱ्यांचा मका, सोयाबीन, टोमॅटो आदी पिकातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहात असल्याने या पिकांचे नुकसान होण्याची धास्ती बळीराजाला निर्माण झाली आहे. (०८ मानोरी १/२/३)
080921\08nsk_10_08092021_13.jpg
०८ मानोरी २