अहवालात अनेक बाबींकडे दुर्लक्ष ?मंगला एक्स्प्रेस अपघात : रुळांना तडे गेल्याचे कळवूनही दुर्लक्ष करणाऱ्यांना ‘क्लीन चिट’
नाशिक : नोव्हेंबर २०१३ मध्ये घोटी येथे झालेल्या मंगला एक्स्प्रेस अपघाताचा अहवाल तब्बल दहा महिन्यांनी प्राप्त झाला आहे. अहवालात रेल्वेरुळाला तडा गेल्याने अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे; परंतु यास जबाबदार कोण आणि तडा गेल्याबाबतची आगाऊ सूचना देऊनही दुर्लक्ष केल्या प्रकरणाचा ठपका कुणावरही ठेवण्यात आला नसल्याने चौकशीतील महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होऊ लागला आहे. १५ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी घोटी येथे मुंबईकडे जाणारी मंगला एक्स्प्रेस रुळावरून घसल्याने मोठा अपघात झाला होता. त्यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त चेतन बक्षी यांची नेमणूक करण्यात आली होती. बक्षी यांनी नाशिकमध्ये दोन दिवस आणि मनमाड येथेही दोन दिवस या प्रकरणाची चौकशी करून जबाब नोंदविले होते. चौकशीसाठी नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना समोर येण्याचे जाहीर आवाहनही करण्यात आले होते. असे असतानाही अहवाल हा अपेक्षित नसल्याचे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खासगीत सांगितले. रेल्वे रुळावरून गाडी घसरल्याने दुर्घटना घडल्याचे सांगितले जात असले, तरी रेल्वेरुळाचे ज्याप्रमाणे तुकडे तुकडे झाले त्यावरून या ठिकाणचे रेल्वेरूळ सरकलेले असावेत किंवा त्यांना तडे गेलेले असावेत, असा अनेकांनी जबाब दिलेला होता. विशेष म्हणजे, सदर रेल्वेरुळाची डागडुजी करावी लागेल, असे घटनेपूर्वी दोन महिने अगोदरच येथील गॅँगमनने घोटीचे स्टेशनमास्तर गोगई यांना कळविल्याचे समोर आले होते; मात्र त्याकडे फारसे गांभिर्याने पाहिले न गेल्याने या प्रकरणात मोठा हलगर्जीपणा झाल्याची चर्चा तेव्हाच सुरू होती. घटनेपूर्वी काही दिवस अगोदरच या मार्गावरील मालगाडी थांबविण्यात आली होतीे. रेल्वेरूळ सुस्थितीत नसल्याने किंवा रूळ वाकलेल्या अवस्थेत असल्याने मालगाडी थांबल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. असे असतानाही चौकशीत या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अपघाताच्या काही दिवस अगोदरच जर रुळामधील दोषामुळे गाडी थांबवावी लागली असेल, तर तेव्हाच त्यावर उपाययोजना का करण्यात आली नाही याची नोंद अहवालात नसल्याने आणि त्याविषयी भाष्य नसल्याने काही अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप होत आहे. अर्थात, अहवाल पूर्णपणे प्राप्त झालेला नसला, तरी नेहमीप्रमाणेच अहवालात कुणावरही ठपका ठेवण्यात आला नसावा, असे रेल्वेतील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. अपघाताची चौकशी आणि अहवाल केवळ शासकीय सोपस्कार असल्याचेही खासगीत बोलले जात आहे. (प्रतिनिधी)