त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
सोयगाव : मालेगावचा मोसम पूल मृत्यूचा सापळा बनला असून पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मालेगाव मध्य व बाह्य मतदारसंघाला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या पुलाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.
शहरातील जवळपास अडीच लाख लोकांचा रोजचा वापर या पुलावरून होतो. तालुक्यातील ४० ते ४५ खेड्यातील लोक व जळगांव, धुळे, नंदूरबार, शहादा, इंदोर, गुजरात, नाशिक, मुंबई, पुणे, ठाणे जाणाऱ्या येणाऱ्या बसेस मोसम पुलाचा वापर करतात. मालेगाव मध्यकडे, बस स्टॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात ह्या खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना ह्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
पुलावरून जातांना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार व रिक्षाचालक तर जेरीस आले आहेत. म.न.पा. कधी जागी होईल असा सवाल विचारला जात आहे. पुलावरून जातांना खड्डे टाळण्याच्या नादात दुचाकीस्वार, रिक्षाचालक यांचा तोल जाऊन खाली खोल नदीत पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन-तीन महिन्यांपासून खड्ड्यांची संख्या वाढली असून मालेगांव मनपाचे अद्यापपर्यंत ह्या समस्येकडे लक्ष वेधलेले नाही. वाहनचालक जीवानिशी गेल्यास पालिका जागी होईल का? शहरातील सर्वात जुना आणि सततची रहदारी असलेला पूल वाहनचालकांच्या मृत्यूचा सापळा बनला आहे.
कोट...
पुलाची अवस्था बिकट झाली असून स्टॅण्ड ते देवीच्या मळ्यापर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. दररोज कामानिमित्त ये-जा करावी लागत असल्याने पाठदुखी व कंबरदुखीचा त्रास बऱ्याच जणांना जडला आहे. वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. मनपाने लवकरात लवकर रस्ता व पूल दुरुस्त करावा.
- प्रदीप अहिरे, शिक्षक, मालेगाव