कुणाच्या डोक्यातून काय-काय सु-पीक निघेल याचा अंदाज न बांधलेलाच बरा. झालेही तसेच. शालेय विद्यार्थी. तोही प्राथमिकच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्गाचा असावा. तो एका वर्गातून दुसऱ्या वर्गात गेला. त्या वर्गाला कुठलीतरी स्पर्धा परीक्षा होती. अर्थात अलीकडे प्रत्येक वर्गासाठी कोणती ना कोणती स्पर्धा परीक्षा घेतली जाते मात्र ती शासनाची नसते. कोणत्या तरी शालेय साहित्य पुरविणाऱ्या कंपनीकडून असते. असो, तर त्या परीक्षेमध्ये वर्गातील अनेकांनी सहभाग घेतला. त्यासाठीच्या तयारीसाठी वर्गशिक्षकाकडे (?) जबाबदारी होती. त्यानेही ती पार पाडली. कालांतराने परीक्षा झाली. निकालही लागला. बऱ्यापैकी मुलांनी यश नोंदविले. काहींना त्या तुलनेने कमी गुण पडले. त्यामुळे काही पालकांनी वर्गशिक्षकाची भेट घेतली आणि आपल्या पाल्याच्या गुण अन् अभ्यासासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी वर्गशिक्षकानेही त्या-त्या विद्यार्थ्यांची कारणमीमांसा केली. पालकांनीही गेल्या वर्षीच्या स्पर्धा परीक्षेत आपल्या पाल्याने चांगले यश मिळविले होते याची आठवणही करून दिली. झालं... पालक वर्गातून आपल्या पाल्यासह बाहेर आले. यातील एका पालकाने आपल्या पाल्याला ‘गेल्या वेळी मस्त नंबर आला होता तुझा, यावेळी असे रे कसे झाले!’ यावर त्या पाल्यानेही हजरजबाबीपणाने लगेचच उत्तर फेकले, ‘अहो पप्पा, ह्या सरांचे ना काहीच कळत नाही. गेल्या वर्षी मॅडम होत्या अन् त्या आमच्या आवडत्या होत्या.’ पालक- ‘अरे मॅडम अन् सर, कोणीही असो, दोघेही सारखंच शिकवतात ना, मग. पाल्य- ‘नाही हो, तुम्ही पाहिल्या नाही का, त्या मॅडम किती सुंदर होत्या अन् त्या शिकवायच्याही छान-छान...’ पालकाने काही क्षण फक्त त्या आपल्या निरागस पाल्याच्या तोंडाकडेच पहात राहिले... आहे ना गंमत!!! बिचाऱ्या पालकांना तेव्हाच कळले असेल, दुसऱ्या-तिसऱ्या वर्गाच्या मुलांनाही सौंदर्याची महती कळते.
मॅडम किती सुंदर होत्या...
By admin | Updated: July 22, 2014 21:45 IST