नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मध्य महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाने हजेरी लावली असून, त्याचा आरोग्यावर आणि पिकांवर विपरीत परिणाम होतो आहे. दोन दिवसांपासून शहराच्या तपमानात घट होत असून, शनिवारी पारा नीचांकी १३ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. रविवारी त्यात २ अंशांनी वाढ झाली असली तरी कमाल तपमानात सुमारे ५ अंशांची घट झाल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. राज्याच्या सीमेलगत आणि समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचे आगमन होत असून, येत्या दोन दिवस हे वातावरण कायम राहणार असल्याचे वेधशाळेने कळविले आहे. मध्य समुद्रात आणि राज्याच्या किनारपट्टीलगत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुजरातच्या सीमेलगत अणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. अवेळी आलेला हा पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार हजेरी लावीत आहे. त्यामुळे थंडीतही वाढ होते आहे. आधीच साथीच्या आजारांची साथ असलेल्या राज्यात पावसाच्या या वातावरणामुळे थंडीतापाचे रुग्ण आणखी वाढले आहेत. नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी या पावसाने हजेरी लावली असून, त्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस कोसळला. रविवारी दुपारी आणि रात्री उशिराही पावसाने हजेरी लावल्याने रात्री थंडीत वाढ झाली होती. आणखी काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार असून, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. थंडीतही त्यामुळे वाढ होणार असल्याचे कळविले आहे.
जनजीवन विस्कळीत : आरोग्यावर विपरीत परिणाम;
By admin | Updated: March 2, 2015 00:06 IST