नाशिक : निसर्गातील वनौषधी आणि त्यांचे विविध गुणधर्मांची माहिती करून घेण्यासाठी आपलं पर्यावरण संस्थेच्या पंधरा सदस्यांनी हरसूल जवळील खोरीपाड्याला भेट दिली. मागील चाळीस वर्षांपासून वनौषधींद्वारे निसर्गोपचार करणारे ज्येष्ठ वैद्य शंकर शिंदे यांनी या सदस्यांना जंगलाची भ्रमंती घडवत वनौषधींची ओळख करून दिली.शहरापासून ५५ किलोमीटरवर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खोरीपाडा येथे पर्यावरण शाळेच्या पहिला वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सात महिला, आठ युवक या पर्यावरण शाळेमध्ये सहभागी झाले होते. वैद्य शिंदे यांनी जंगलामधील विविध वनौषधींची माहिती सांगितली. खोरीपाडा ही चारशे लोकसंख्या असलेली लहान वस्ती आहे. या आदिवासी पाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील आदिवासी गावकऱ्यांचे निसर्गावर असलेले प्रेम. या गावातील लोकांनी येथील वृक्षसंपदा, जैवविविधता जोपासण्याचा वसा घेतला आहे. वनविभागाच्या मदतीने गावकऱ्यांनी गावाच्या डोंगराच्या पायथ्याशी गिधाड भोजनालय यशस्वीपणे सुरू ठेवले आहे. आयुर्वेदशास्त्र हे वनौषधीवरच आधारलेले आहे. आदिवासी भागामध्ये आजही वनौषधींची माहिती असलेले आणि त्याद्वारे मुक्या प्राण्यांपासून तर माणसांपर्यंत आरोग्य उपचार करणारे वैद्य कार्यरत आहेत. या वैद्यांकडे वनौषधी व त्याचे गुणधर्म या विषयीचे प्रचंड ज्ञान असून अनुभवाने त्यांनी ते मिळविले आहे. या ज्ञानाचा फायदा आजच्या शिकलेल्या आधुनिक युगातील पिढीला व्हावा आणि निसर्गातील वनौषधींची जोपसना उत्तरोत्तर होत जावी, या उद्देशाने ‘पर्यावरण शाळा’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपलं पर्यावरण संस्थेने यासाठी पुढाकार घेत व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून सदर संकल्पना संस्थेशी जोडलेल्या शेकडो सदस्यांपर्यंत पोहचविली आहे. यापैकी ज्यांना निसर्ग जाणून घेण्याची आवड आहे, अशा सदस्यांनी नोंदणी करत सहभाग घेतला. प्रत्येक वर्गाला पंधरा सदस्यांची मर्यादा ठेवण्यात आली असून, लवकरच दुसरा वर्ग पेठ तालुक्यातील पाड्याभोवतालच्या जंगलामध्ये आयोजित केला जाणार आहे.
आदिवासी भागातील जंगलात गिरविले वनौषधींचे धडे
By admin | Updated: September 26, 2016 02:10 IST