विजयनगर परिसरातील नदीच्या काठावर असलेल्या शेतमळ्यात दररोज सायंकाळी ७ वाजेपासून बिबट्या मुक्त संचार करीत असून, जंगली परिसर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेतातच घरे बांधून शेजारीच जनावरांसाठी गोठे बांधले आहेत. सुनील लव्हे यांच्या घरासमोर गोठ्यात अनेक शेळ्या बांधण्यात आल्या होत्या. गुरुवारी (दि.२३) रात्री अंधाराचा फायदा घेत दोन बिबट्यांनी या शेळ्यांवर हल्ला चढवला. यात दोन शेळ्या फस्त करण्यात आल्या तर तीन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. बिबट्याच्या हल्ल्यामुळे आरडाओरडा होताच बिबट्याने तेथून पळ काढल्याची माहिती कैलास कुटे यांनी दिली. परिसरात दिवसा व रात्री बिबट्याचा संचार वाढल्याने नागरिक भयभीत झाले असल्याने परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी तानाजी करंजकर, कैलास कुटे, रामकिसन करंजकर, योगेश करंजकर, संदीप करंजकर, नारायण करंजकर, सुनील करंजकर आदींनी केली आहे.
देवळाली कॅम्पला बिबट्यांचा शेळ्यांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST