पाथर्डी फाटा : विल्होळी गावाजवळील वाताहत झालेल्या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ‘लोकमत’च्या ‘अंडरपास होत नाही तोपर्यंत पूर्णपणे खराब झालेला रस्ता तरी दुरुस्त करावा’ या आशयाचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर यंत्रणेला उशिरा सुचलेले हे शहाणपण असल्याच्या प्रतिक्रि या नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. विल्होळी गावाजवळ अंडरपास करण्यात काही अडचणी होत्या; मात्र अंडरपासचे काम झाले तर नाहीच शिवाय इथला रस्ताही साधा दुरुस्त केला जात नव्हता. महामार्गाच्या दोन्ही बाजूने रस्ता खड्ड्यांनी चाळण झालेल्या अवस्थेत होता. नाशिककडे येतानाच्या रस्त्याची तर या ठिकाणी पूर्ती वाट लागली होती. गेल्याच आठवड्यात येथील अंडरपास होण्याबाबत आणि रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. पावसाळ्यानंतर अंडरपासचे आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी इथला रस्ताही पावसाळ्यात दुरुस्त करायला घेतल्याने नागरिकांनी समाधान केले खरे; मात्र हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचेही सांगितले. (वार्ताहर)
उशिरा का होईना यंत्रणेला सुचले शहाणपण
By admin | Updated: August 25, 2016 00:07 IST