लासलगाव : अनुकूल परिस्थिती प्रत्येकाच्या वाट्याला येईलच असे नाही; परंतु प्रतिकूल परिस्थितीशी झगडून पुढे जाणाऱ्या व्यक्तींनी इतिहास घडविला आहे. तशी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. पदवी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कामाची लाज न वाटता कष्टाची तयारी ठेवत परिस्थितीवर मात करून आयुष्य सुंदर बनविले पाहिजे, असे प्रतिपादन कवी प्रकाश होळकर यांनी केले.येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संपन्न झालेल्या पहिल्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेचे सदस्य किशनसिंग भल्ला तर प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, उपप्राचार्य प्रा. जे. बी. शिंदे, प्रा. डॉ. आर. बी. पाटील, प्रा. भूषण हिरे, विद्यापीठ प्रतिनिधी स्नेहल होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.भल्ला यांनी बोलताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिक्षणामागे देशातील सर्व स्तरातील माणसांचा हातभार लागलेला असतो. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून पदवीनंतर विद्यार्थ्यांनी कुटुंब, समाज, परिसर पर्यायाने देश हितासाठी कार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी अनिल डागा, प्रकाश पाटील, अॅड. के. जे. बूब, हसमुख पटेल, चंद्रशेखर भावसार, योगेश पाटील, अॅड. संदीप होळकर पालक उपस्थित होते. (वार्ताहर)
लासलगावी पदवीदान समारंभ
By admin | Updated: May 4, 2016 23:34 IST