लाखलगाव गंगापाडळी ग्रुप ग्रामपंचायतचा विस्तार व लोकसंख्याही मोठी आहे. दोन्ही गावांना पिण्याचे व वापराचे पाणीपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या व विजेच्या मोटारी बसविलेल्या आहेत. येथे प्रशासकाची नेमणूक केली असल्याने त्यांनी नागरिकांची प्राथमिक गरज म्हणून इतर अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आधी विजेचे बिल भरणे गरजेचे होते. मात्र लाखो रुपयाची थकबाकी वाढली असल्याने महावितरण कंपनीने गावातील काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ग्रामपंचायतचे सुमारे ३ लाख ६६ हजार ५६० इतके वीज बिल थकीत आहे. त्यामुळे गंगापाडळी व लाखलगाव येथील काही ठिकाणच्या मोटारीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचे समजते. वीज बिल त्वरित भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.
कोट-
येथे प्रशासक नेमल्यापासून नागरिकांच्या मूलभूत गरजांकडेच दुर्लक्ष झाले आहे. अत्यावश्यक सेवांकडे दुर्लक्ष करून अनावश्यक कामे केली आहेत. त्यामुळे विजेचे बिल थकले की थकविण्यात आले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. वास्तविक विजेचे बिल आल्यावर लगेचच भरले गेले असते तर आता थकबाकी वाढली नसती. नवनिर्वाचित सरपंच निवडीच्या आत प्रशासकांनी हे बिल भरावे.
आत्माराम दाते - ग्रामपंचायत सदस्य