खामखेडा : पूर्वी दिवसभर शेतात काम करून सायंकाळी घरी आल्यानंतर जेवण झाले की, गावातील पुरुषमंडळी गावाच्या मंदिराजवळ पारावर एकत्र येऊन गप्पा मारत असे. उत्तरोत्तर रंगणाऱ्या गप्पांचे चित्र ग्रामीण भागांमध्ये दुर्मीळ होत आहे.पूर्वीपासून गावाच्या मंदिराजवळ पार असे. तेथे पिंपळ किंवा वडाचे झाडाखाली बांधकाम करून पार तयार करण्यात येत असे. दिवसभर गावातील वृद्धमंडळी तेथे जमत तर काही माणसे गप्पा करीत असे.ग्रामीण भागातील दिवसभर शेतात काम करणारा शेतकरी व्यापार व नोकरीनिमित्ताने परगावी ये - जा करू लागला. व्यापारी व नोकरदार सायंकाळी गावी यायचे. रात्री जेवण झाल्यानंतर ही पुरुष मंडळी पारावर एकत्र यायचे तेथे दिवसभरातील घडामोडींवर चर्चा व्हायची अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणाची चर्चा रंगायची.आता परिस्थिती बदलली आहे. गावातील पाराची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. आता शेतकरी व्यवसाय असल्यामुळे शेतकरी शेतामध्ये वास्तव्य करून राहू लागला आहे. घरामध्ये करमणुकीची साधने वाढली आहेत. काही नोकरदार शहरामध्ये राहू लागले. ग्रामीण भागामध्ये वाडी, वस्तीवर सॅटेलाईट छत्र्या पोहोचल्या आहेत. त्यामुळे ताज्या घडामोडींच्या बातम्या, मनोरंजनाची साधने वाढली आहेत. अनेक मालिका दाखवल्या जाऊ लागल्या आहे. त्यामुळे जेवण झाल्यानंतर घराबाहेर पडणारी पुरूषमंडळी आता दूरदर्शन संचासमोर बसू लागली आहे. आजच्या संगणकाच्या युगामध्ये कोणाला ऐकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. यामुळे पारावरील गप्पा दुर्मीळ झाल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
पारावरच्या गप्पा झाल्या कमी
By admin | Updated: September 16, 2014 00:07 IST