सिन्नर : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने नाशिकरोड ते मुंबई मंत्रालयापर्यंत सोमवार (दि. १) पासून लॉँग मार्चचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संजय धरम व राज्य समन्वयक प्रवीण कर्डक यांनी दिली. राज्यात महसूल विभागात सुमारे १२ हजार ६३७ कोतवाल स्वातंत्र्य पूर्व काळापासून काम करीत आहेत. कोतवालांना दरमहा पाच हजार रुपये मानधन व दहा रुपये चप्पल भत्ता मिळतो. कोतवालांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ५० वर्षांपासून सातत्याने राज्यातील कोतवाल बेमुदत धरणे, आंदोलने, संप व उपोषण करीत आहेत. शासन स्तरावर कोतवालांच्या चतुर्थश्रेणीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. कोतवालांकडून नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण, निवडणुकीचे कामे व विविध शासकीय योजनांची कामे २४ तास करून घेतली जात असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. महसुूलाचा पाय समजला जाणारा कोतवाल आत्तापर्यंत उपाशीपोटी जगत आला असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. महागाईच्या काळात मुलांचे शिक्षण, निवारा, आजारपण असे अनेक प्रश्न कोतवालांना भेडसावत आहेत. कोतवालांना चतुर्थश्रेणी बहाल करावी तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत या मागणीसाठी मंगळवार (दि. १) पासून सकाळी ११ वाजेपासून नाशिकरोड बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून लॉँग मार्चचे (पायी संघर्ष सत्याग्रह) सुरुवात करण्यात येणार आहे. घोटी, कसारा, कल्याण, ठाणे, दादर मार्गे मंत्रालय मुंबई येथे लॉँग मार्च जाणार असून, मागण्या नामंजूर झाल्यास त्याठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. लॉँग मार्चमध्ये राज्यातून कोतवाल सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)
कोतवाल संघटनेचा मंगळवारपासून लॉँग मार्च
By admin | Updated: June 29, 2014 00:53 IST