सटाणा : तालुक्यातील आराई येथील शेकडो शेतकरी खरीप अनुदानापासून वंचित आहेत. वंचित शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान अदा करून दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा तहसीलदार सुनील सौंदाणे यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सन २०१५ च्या खरिपासाठी अनुदान जाहीर केले होते. बागलाण तालुक्याचाही यात समावेश करण्यात आला होता. तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना महसूल विभागाने तत्काळ अनुदान अदा करून द्यावे या मागणीसाठी शेतकरी राजेंद्र बारकू रौंदळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सुनील सौंदाणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी तहसीलदार सौंदाणे यांनी शासनाच्या भरपाई अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेऊनच याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, राहिलेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ मिळेल, असे सांगितले. या प्रसंगी पंचायत समितीचे सदस्य परशुराम अहिरे, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, आराईचे माजी सरपंच माधव अहिरे, समीर पाटील, चिंधा पाटील, नीलेश अहिरे, विलास अहिरे, नितीन सोनवणे, हेमंत निकम, मनोज सोनवणे, देवा अहिरे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
खरीप भरपाई अनुदानापासून वंचित
By admin | Updated: September 8, 2016 00:37 IST