सटाणा : तालुक्याचे राजकारण करतांना केळझरचे पाणी पळवून आम्ही आरम खोऱ्यातील जनतेला धोका देणार नाही, परंतु आम्हाला मते द्या या अटीवर मतांचा जोगवा मागणाऱ्या आमदार दीपिका चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण या दाम्पत्याने सटाणा शहरासाठी असलेल्या केळझर पाणी पुरवठा योजने संदर्भात येत्या दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा गाव बंदी करून चव्हाण दाम्पत्याविरु ध्द आंदोलन पुकारले जाईल अशी टोकाची भूमिका मंगळवारी झालेल्या केळझर कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आली. कृती समितीच्या या इशाऱ्यामुळे भरपावसाळयात केळझरचे पाणी पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.सटाणा शहरासाठी केळझर धरणावर ९५ दशलक्षघनफुट पाण्याचे आरक्षण करून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. सन १९९८ मध्ये या महत्वाकांक्षी योजनेचे काम सुरु होण्यापूर्वीच सटाणा शहर विरुध्द लाभक्षेत्रातील दहा गावे असा संघर्ष पेटला.या संघर्षात माजी मंत्री ए. टी. पवार यांनी उडी घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चांगलीच धार आली आणि पाईपलाईनचे काम बंद पाडले. त्यामुळे पालिकेने पाईपलाईन आणि वहिरीचे काम वगळता टप्पा १ व २ चे काम पूर्णत्वास नेले. मात्र उर्वरित कामासाठी दहा गावातील शेतकरी विरूध्द सटाणा शहर असा संघर्ष पेटतच राहिला या आंदोलनाची धग अनेक राजकारण्यांना मारक आणि पोषकही ठरली. दरम्यान चव्हाण दाम्पत्याने पुनंदचे पाणी आणण्यासाठी केळझर योजना गुंडाळण्याचा पारित केलेला ठराव पालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधकांनी हाणून पाडत केळझरचे हक्काचे पाणीच आम्हाला हवे अशी भूमिका घेऊन आंदोलन पुकारले होते. त्यामुळे आरम खोऱ्यातील केळझर कृती समितीला आठ वर्षांनंतर पुन्हा जाग आली असून पूर्वीची भूमिका कायम ठेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) दुपारी डांगसौंदाणे येथे समितीने शेतकऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वानुमते चव्हाण दाम्पत्याला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत सर्वच शेतकऱ्यांनी आपली मते मांडताना गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण यांनी केळझर धरणातून शहरासाठी एक थेंब घेणार नाही अशी भूमिका घेऊन मतांचा जोगवा मागितला आहे. त्यामुळे चव्हाण आमचा विश्वासघात करणार नाही ही आम्हाला खात्री असून त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. येत्या दोन दिवसात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्यास त्यांच्या विरु द्ध आंदोलनाचा पावित्रा घेण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पुढील आठवड्यात चौधाने येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचेही कृती समितीचे अध्यक्ष शिवाजी सोनवणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील, पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, कृती समितीचे सचिव कैलास बोरसे, केदाबापू काकुळते, एन. डी. जाधव, कडू सावकार , माहरू दगा पाटील यांची भाषणे झाली. बैठकीस मुंजवाडचे सरपंच गणेश जाधव, संजय जगदाळे, गुलाब जाधव, भास्कर बिरारी, किसनदास बैरागी, निकवेलचे सरपंच दीपक वाघ, अमृता बिरारी, संजय बिरारी, धनिसंग दातरे , देवराम टोपले यांच्यासह शंभर ते दीडशे शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
केळझरचे पाणी पेटणार
By admin | Updated: September 22, 2015 23:38 IST