सिन्नर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अडीच वर्षे तालुकाध्यक्ष भूषविलेल्या जयंत आव्हाड यांनी गेल्या महिन्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षाच्या धोरणावर व राज ठाकरे यांच्या दुटप्पीपणावर टीकास्त्र सोडत पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.सुमारे अडीच वर्षापूर्वी आव्हाड यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांची सोबत सोडत मनसेत प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून त्यांची उमेदवारी गृहीत धरली जात होती. तथापि, लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारास सिन्नर तालुक्यातून मिळालेली मते पाहिल्यानंतर त्यांनी गेल्या महिन्यात तालुकाध्यक्षपदाचा व आज पक्षाचा सभासदत्वाचा राजीनामा दिला.शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे बोलत नसल्याचे तसेच विकासाची ब्लू प्रिंट आपल्याकडे असल्याची वल्गना करणाऱ्या ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे कधीही ऐकून घेतले नसल्याचे आव्हाड यांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वीच मोदी पंतप्रधान व्हावेत यासाठी स्तुतिसुमने उधळणारे राज ठाकरे कधी मोदी यांच्यावर टीका करतात तर कधी आपण मोदी यांच्याविरोधात काहीच बोललो नाही असे म्हणतात. राज ठाकरे यांच्या दुटप्पी धोरणामुळे कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. राज ठाकरे कॉँग्रेस व राष्ट्रवादी विरोधात काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हणजे कॉँग्रेस पक्षाची बी टीम असल्याची धारणा लोकांमध्ये निर्माण झाल्याचे आव्हाड यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह पक्षाचा राजीनामा देत असल्याचे आव्हाड यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. (वार्ताहर)
जयंत आव्हाड यांचा मनसे सदस्यत्वाचाही राजीनामा
By admin | Updated: July 30, 2014 00:22 IST