नाशिक : ई.पी.एफ. ९५ अंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांना दरमहा तीन हजार रुपये व त्यावर महागाई भत्ता तातडीने देण्याची मागणी भाजपाचे त्यावेळेचे राज्यसभेचे सदस्य असताना प्रकाश जावडेकर यांनी केली होती. सध्या केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आले असून, जावडेकर केंद्रीय मंत्री झाले आहेत. त्यांनी पेन्शनधारकांना न्याय द्यावा, या मागणीसाठी येत्या २७ तारखेला पुणे येथील त्यांच्या संपर्क कार्यालयावर पेन्शनधारकांकडून स्मरणयात्रा काढण्यात येणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस उदय भट यांनी पेन्शन हक्क परिषदेमध्ये जाहीर केले.नाशिक जिल्हा पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित पेन्शन हक्क परिषदेत भट यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी भविष्यनिर्वाह निधी विभागाचे आयुक्त जगदीश तांबे, सहायक कामगार आयुक्त विकास माळी, फेडरेशनचे संस्थापक राजू देसले, उपाध्यक्ष सुभाष काकड आदि मान्यवर उपस्थित होते. देश उभारण्यासाठी आपलेही योगदान असून, आपण विस्थापित असल्यामुळे भांडवलदारांचे फावले आहे. सेवानिवृत्त कामगारांनी अशीच एकजूट येत्या २७ तारखेला स्मरण यात्रेच्या वेळी दाखविल्यास ई.पी.एफ. पेन्शनधारकांना नक्की न्याय मिळेल. स्वत:ची पाठ थोपटवून घेणाऱ्या राज्यकर्त्यांकडून विकासाचे चित्र रंगविले जात आहे. सेवानिवृत्त कामगारांसाठी कोणत्याही प्रकारचे ‘अच्छे दिन’ अद्याप आले नसून केवळ भांडवलदार व सटोड्यांसाठीच या सरकारने ‘अच्छे दिन’ आणल्याची टीका यावेळी भट यांनी बोलताना केली. पेन्शनधारकांनी पेन्शनसंदर्भात किंवा भविष्य निर्वाह निधीबाबत कुठल्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास विनासंकोच थेट संपर्क साधावा, असे आवाहन तांबे यांनी यावेळी केले. नाशिक विभागातील ८०० अस्थापनांना मी कारणे दाखवा व कामगारांना भविष्यनिर्वाह निधीमधील रक्कम अदा करणेबाबत नोटिसा बजावल्या असल्याचे ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)
जावडेकरांच्या संपर्क कार्यालयावर ‘स्मरणयात्रा’
By admin | Updated: July 8, 2014 00:54 IST