नाशिक :‘माझ्या हाती एकहाती सत्ता द्या, मी नाशिकचे नवनिर्माण करतो’, अशी ग्वाही पाच वर्षांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली आणि नाशिककरांनी मनसेच्या पदरात सर्वाधिक ४० जागा टाकल्या. परंतु, पाच वर्षांत नाशिककरांच्या वाट्याला निराशाच आली. आता त्याचीच पुनरावृत्ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दत्तक विधानामुळे होते की काय, अशी भीती आतापासूनच व्यक्त केली जाऊ लागली आहे. ब्ल्यू प्रिंट आणि नवनिर्माण या शब्दांनी राज ठाकरे यांच्या मनसेचा पिच्छा पुरवला आता ‘दत्तक’ हा शब्द सत्तारूढ भाजपाला सातत्याने छळणार आहे. त्यामुळे पाच वर्षांत दत्तक पुत्राला ‘अच्छे दिन’ आणण्याचे आव्हान भाजपा सत्तेपुढे असणार आहे. महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक ६६ सदस्य निवडून आले आहेत. त्याखालोखाल शिवसेनेचे ३५, कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, मनसेचे पाच, अपक्ष तीन आणि रिपाइंचा एक सदस्य निवडून आला आहे. भाजपाला विरोधकांच्या कुबड्यांची अजिबात गरज भासणार नाही. त्यामुळे विविध सत्तापदे सहजगत्या उपभोगता येणे शक्य होणार आहे. भाजपाकडे निर्विवाद बहुमत असल्याने कोणत्याही योजना राबविण्यात अडसर येणार नाही. परंतु, हाती-तोंडातून आलेला घास हिरावून न्यावा तशी अवस्था झालेल्या शिवसेनेकडून मात्र भाजपाच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर असणार आहे. शिवाय, अल्प संख्येने असले तरी कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मनसे यांच्याकडे अभ्यासू व आक्रमक असे सदस्य आहेत. त्यामुळे भाजपाला मनमानीपणे कोणताही निर्णय घेणे सोपे निश्चितच नाही. यंदा सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांमध्ये आक्रमक असे सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सभागृह चालविण्यासही पीठासन अधिकारी असलेल्या महापौरांची चांगलीच कसोटी लागणार आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली आणि आपण स्वत: जातीने लक्ष पुरविणार असल्याचे सांगून टाकले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला नाशिककरांनी जोरदार प्रतिसाद देत भाजपाच्या पारड्यात तब्बल ६६ जागा टाकल्या. आता महापालिकेत भाजपा सत्तारूढ झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून सत्ताधाऱ्यांना ‘दत्तक’ या शब्दाचे ओझे वाटू लागले आहे. महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरू केलेल्या खातेनिहाय आढावा बैठकीत वारंवार ‘दत्तक’ नाशिकची जाणीव अधिकाऱ्यांना करून दिली जात आहे आणि त्यातूनच विकासकामांचा दबावही प्रशासनावर टाकला जाऊ लागला आहे. मनसेच्या सत्ता येण्यापूर्वी राज ठाकरे यांनीही आपण दर महिन्याला नाशिकला भेट देणार असल्याचे जाहीर केले होते. सुरुवातीला राज यांनी दाखविलेला उत्साह नंतर आटला आणि पुढे राज यांची नाशिक भेट कुचेष्टेचा विषय बनत गेली. आता भाजपाच्या सत्ताकाळात मुख्यमंत्र्यांनी आपल्या दत्तक पुत्राकडे जातीने लक्ष दिले नाही तर मनसेसारखीच स्थिती भाजपाचीही होऊ शकते. नाशिककरांच्या अपेक्षा वाढविल्या तर काय होते, याची कटू अनुभूती राज ठाकरे यांनी घेतलेली आहे. त्यामुळे सत्तारूढ झालेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांपुढे ‘दत्तक’ विधानाचे मोठे आव्हान असणार आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने पुढील पाच वर्षांत आपली भूमिका काय असेल, याची झलक दाखविण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत पहारेकऱ्याची भूमिका निभावणाऱ्या भाजपाच्या नाशिकमधील सत्तेवर सेनेचा जागता पहारा राहणार असल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे बहुमतात असले तरी भाजपाला विरोधीपक्षाच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. (समाप्त)
दत्तकविधानाचा मुद्दा वारंवार छळणार !
By admin | Updated: March 31, 2017 00:58 IST