नाशिक : बोगदा बंद झाल्याने गोविंदनगरकडे जाण्यासाठी जवळपास दोन किलोमीटर अंतराचा फेरा मारावा लागणाऱ्या इंदिरानगरवासीयांसाठी लेखानगर उड्डाणपुलाच्या अलीकडेच खाली सोय करून देण्यात येणार असून, त्यामुळे मोठे अंतर वाचणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासंदर्भात नुकतीच पाहणी करून तसा प्रस्तावही सादर केल्याने राणेनगर व लेखानगर बोगद्यात होणारी वाहतुकीची कोंडी दूर तर होईलच; परंतु अंतरही कमी होण्यास मदत होणार आहे. इंदिरानगर ते गोविंदनगरला जोडणारा बोगदा बंद करून पोलिसांनी इंदिरानगरवासीयांसाठी लेखानगर येथील उड्डाणपुलाखालून यू-टर्न घेण्याचे आवाहन वाहनचालकांना केले होते. इंदिरानगर बोगदा ते लेखानगर उड्डाणपूल हे अंतर एका बाजूने एक किलोमीटर इतके असून, लेखानगर उड्डाणपुलाखालून गोविंदनगरकडे जाताना वाहनचालकाला जवळपास दोन किलोमीटर अंतराचा फेरा मारावा लागत होता. त्यामुळे बहुतांशी वाहनचालक लेखानगरकडे उलट दिशेने जाण्यास अनुत्सुक होत, इंदिरानगरच्या समांतर रस्त्याने मुंबईनाका गाठत. इंदिरानगरचा बोगदा पूर्ववत सुरू करावा यासाठी जनमताचा रेटा वाढत असला तरी तो खुला होण्याबाबत अद्यापही संभ्रम आहे. अशा परिस्थितीत बोगद्याला पर्याय म्हणून इंदिरानगरकडून लेखानगरच्या बोगद्याकडे जाण्यापूर्वी दोनशे मीटर अगोदर उड्डाणपुलाखालील भाग गोविंदनगरकडे जाण्यासाठी यू-टर्नसाठी खुला करण्याचे ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे दोन किलोमीटरचा फेरा दीड किलोमीटरपर्यंत येणार असून, त्यामुळे वेळ व इंधनाची बचत होण्याबरोबरच लेखानगर, राणेनगर येथील वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत होणार असल्याचा पर्याय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शोधून काढला आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविण्यात आला असून, लवकरच या कामाची सुरुवात केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
इंदिरानगरवासीयांचे दोनशे मीटर अंतर कमी
By admin | Updated: August 8, 2015 23:54 IST