नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची उभारणी सुरू झाली तेव्हापासून सर्वांत मोठा आणि वारंवार चर्चेत येणारा प्रश्न म्हणजे जागेचा असून, आता आणखी सुमारे २० हेक्टर जागा उपलब्ध होणार असल्याने हा प्रश्न काही प्रमाणात का होईना सुटण्याची शक्यता आहे. तरीही येणाऱ्या साधूंचा ओघ पाहता सदर जागा कमीच पडेल, असे काही साधू-महंतांचे म्हणणे आहे.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राममधील जागेचे नियोजन करण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने दोन वर्षांपूर्वी एका खासगी संस्थेला सर्वेक्षणाचे काम दिले होते. सदर संस्थेने जागेचे सर्वेक्षण करून साधुग्राममध्ये सुमारे ३२५ एकर जागेवर सेक्टर ‘ए’ पासून ते ‘जी’पर्यंत सात विभागात प्लॉट पाडण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी देऊन टप्प्याटप्प्याने जागा ताब्यात दिली. परंतु तीनही आखाड्यांनी आपल्या उपआखाड्यांना तसेच खालशांना आणखी जागा हवी अशी मागणी वारंवार केली. एका साधूने तर जागेच्या मागणीसाठी साधुग्राममध्ये उपोषण केले. त्यातच वादग्रस्त साध्वी त्रिकाल भवन्ता यांनीही महिला साध्वीच्या आखाड्यासाठी स्वतंत्र जागेची मागणी केली. याशिवाय अनेक सेवाभावी संस्थांनीही साधू व भाविकांच्या सेवाकार्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी लावून धरली. सर्वांकडून वारंवार जागेची मागणी होत असल्याने प्रशासकीय अधिकारी त्रस्त झाले होते. अखेर सेक्टर तीनसाठी साडेपाच हेक्टर आणि सेक्टर चारसाठी पाच हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय औरंगाबादरोडकडे आणखी सुमारे दहा हेक्टर जागा उपलब्ध झाल्यामुळे एकूण २० हेक्टर जागा मिळाल्याने साधुग्राममधील अतिरिक्त साधू-महंतांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तरीही आणखी साधू आल्यास त्यांचे काय असा प्रश्न साधू-महंतांकडून विचारला जात आहे.
आखाड्यांना मिळणार वाढीव जागा
By admin | Updated: August 7, 2015 23:56 IST