नाशिक : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. कोरोनामुळे मागील वर्षांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, यावर्षी शेतीच्या मशागतीबरोबरच खते आणि बियाण्याचे दरही वाढले असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यासाठी वेळेवर कर्ज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी
नाशिक : मागील काही दिवसांत कोरोना बाधित होणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी अद्याप पूर्ण धोका टळलेला नाही. यामुळे नागरिकांनी यापुढील काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून शासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तरुणांना मिळू लागला रोजगार
नाशिक : शहरातील बार चालकांना ऑनलाइन मद्य विक्रीची परवानगी मिळाल्याने अनेक तरुणांना रोजगार मिळू लागला आहे. घरपोहोच सेवा दिली जात असल्याने अनेक बारचालकांनी डिलेव्हरी बॉयची नेमणूक केली आहे. त्यामुळे अनेकांचा आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
दुकानांच्या वेळेमुळे गैरसोय
नाशिक : किराणा मालाची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहात असल्याने अनेक नागरिकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. सकाळी दुकानात जाणे शक्य होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. दुकानांची वेळ वाढविण्याची मागणी होत आहे.
नवीन भागात जाताना चिंता
नाशिक : शहरातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने नवीन परिसरात जाण्याबाबत नागरिक विचारपूर्वक निर्णय घेत असल्याचे दिसून येते. ज्या परिसरात जायचे आहे तेथे रुग्णांची स्थिती काय आहे, याबाबत चौकशी केल्यानंतरच अनेक जण निर्णय घेतात. यामुळे अनेकांचा परिसरातील वावर कमी झाला आहे.
फळांची विक्री वाढली
नाशिक : रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध फळ खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यामुळे शहरात फळांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. फळांचे दरही यामुळे वाढले आहेत. फळांची दुकानेही पूर्णवेळ सुरू नसतात, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते.
गावागावात लसीकरणासाठी प्रबोधन
नाशिक : जिल्ह्याच्या सर्वच भागात रुग्णसंख्या वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. आपल्या गावात शंभर टक्के लसीकरण व्हावे, यासाठी गावागावातील कर्ती मंडळी कामाला लागली असून, याबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. त्याचबरोबर गावातच लसीकरण मोहीम राबविण्याबाबत नियोजन केले जात आहे.