नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे या ५० क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर नांदूरशिंगोटे ते सिन्नर या वीस किलोमीटरच्या अंतरावर प्रचंड खड्डे पडल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे. अनेकदा मागणी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्यांचा आकार मोठा झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे तयार झाल्याने ते अपघातांना निमंत्रण देणारे ठरू लागले आहेत. या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास परिसरातील दोडीपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने खड्ड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पावसामुळे महामार्गाची जणू चाळण झाली आहे. दरवर्षी पावसाळ्यात महामार्गावर खड्डे पडतात. विशेष म्हणजे हा महामार्ग पुण्यापासून थेट नांदूरशिंगोटे जवळील एक किलोमीटरपर्यंत सुस्थितीत आहे. मात्र तेथून पुढे नाशिककडे मोठी दुरवस्था झाली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दरम्यानचा सुमारे ४१ किलोमीटरचा रस्ता अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे त्याची या पावसाळ्यात आणखीच दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. येथील निमोण नाका व चास नाका येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने ग्रामस्थ, शाळकरी मुले, व्यापारी यांचे हाल होत आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होतात. तसेच खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे मात्र अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय कार्यालय संगमनेर येथे असून, नाशिक अथवा पुण्याकडून येणारे अधिकारी याच रस्त्याने जातात. तसेच या रस्त्याने मालवाहतूक करणारे ट्रक, प्रवासी वाहने, खासगी बस, राज्य परिवहन विभागाच्या बसेस, पर्यटकांचे खासगी वाहने व दुचाकी यांची संख्या लक्षणीय असून, हा महामार्ग रात्रंदिवस सुरू असतो. नांदूरशिंगोटे येथे सिन्नर बाजार समितीचे उपबाजार आवार असून, येथे सोमवारी व शुक्रवारी बाजारासाठी गर्दी होते. कांद्याचे मालट्रक भरून देशात विविध ठिकाणी पाठविण्यात येतात. मात्र खड्ड्यांमुळे अवजड वाहनांचे नुकसान होत असल्याने वाहनचालक वाहनातून माल घेऊन जाण्यास नकार देतात. त्यामुळे व्यापारीही अडचणीत येत आहेत. (वार्ताहर)