मनमाड : नांदगाव तालुक्यातील कऱ्ही गावाला गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या या गावाचा जलयुक्त शिवार योजनेत समावेश करावा, अशी मागणी करणारे निवेदन कऱ्ही ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.नांदगाव व येवला तालुक्याच्या सरहद्दीवर डोंगराळ भागात वसलेल्या कऱ्ही या गावात पावसाच्या अल्पप्रमाणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते. तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी विभागाकडे वारंवार मागणी करूनही जलयुक्त शिवार योजनेत या गावाचा समावेश करण्यात आलेला नाही. सदर योजना गावात नसल्याने शेतकरीवर्गाला मोठे नुकसान सोसावे लागत आहे. ग्रामस्थांच्या निवेदनाचा विचार करून जलयुक्त शिवार मोहीम सुरू करावी, या मागणीसाठी कऱ्ही ग्रामस्थांच्या वतीने सरपंच आशाबाई काकड, उपसरपंच दशरथ लहिरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. या गावाला २००२ सालापासून आजपर्यंत टॅँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे नांदगाव पंचायत समितीचे पत्र या निवेदनासोबत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे. (वार्ताहर)
जलयुक्त शिवारमध्ये समावेश करा
By admin | Updated: January 18, 2016 22:23 IST