सिद्धपिंप्री : नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे मखमलाबाद परिसरातून गेलेला नाशिक डावा तट कालवा अनेक ठिकाणी फुटला असून, अद्यापही कालव्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची शेती धोक्यात आली आहे. सदर बाब सिद्धपिंप्री आणि ओढा येथील रहिवाशांनी पाटबंधारे विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नाशिक डावा तट कालवा मखमलाबाद परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुटलेला आहे. याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाला देण्यातही आलेली आहे, मात्र अद्यापही कालव्याची पाहणीदेखील करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष दुरुस्ती कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्नही विचारला जात आहे. फुटलेल्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोंडावर हंगाम आल्याने लागलीच या कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. मात्र कालव्याची अद्याप पाहणीदेखील करण्यात आलेली नाही. सदर कामाला २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने शेतकऱ्यांना आगामी हंगामाची चिंता लागली आहे. शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम तर वाया गेला आहेच, जर पाटबंधारे विभागाने या कालव्याच्या कामाला सुरुवात केली नाही तर २५ ते ३० गावांचे पाण्याअभावी द्राक्षशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय हंगामही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. सदर बाब लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने तातडीने कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी सिद्धपिंप्री शेतकरी भाऊसाहेब ढिकले, सोसायटी अध्यक्ष यशवंत ढिकले, उपाध्यक्ष राजाराम वराडे, उपसरपंच सुका पवार, सुरेश साळुंके, भाऊसाहेब नाना ढिकले, बाळासाहेब ढिकले, विष्णूदादा पेखळे, नामदेव ढिकले, सुरेश ढिकले आदिंनी केली आहे. (प्रतिनिधी)
फुटलेल्या डावा तट कालव्याकडे दुर्लक्ष
By admin | Updated: September 16, 2016 23:53 IST