येवला : जिल्हा बँकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी उद्दिष्टानुसार वसुली केल्यास दोन वेतनवाढी देऊ, परंतु कामात कुचराई होऊन जर वसुली झाली नाही व एनपीए वाढला तर वेतनवाढी व बोनस रोखणार असल्याचा सज्जड दम नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिला.येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत बुधवारी (दि.२५) येवला, चांदवड, निफाड व नांदगाव या तालुक्यातील बँकेचे विभागीय अधिकारी व शाखा व्यवस्थापकांची वसुलीसाठी आढावा बैठक झाली. बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँक जिवंत राहिली तरच भवितव्य अबाधित आहे. हे कर्मचाऱ्यांनी विसरता कामा नये, शेतकरी हिताला सर्वाधिक प्राधान्य देऊन काम करावे, असे दराडे यावेळी म्हणाले.जिल्हा बँक संचालक व माजी आमदार शिरीश कोतवाल, किशोर दराडे, जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. देसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संचालक कोतवाल यांनी घणाघाती आरोप करीत सहकार खात्याच्या सचिवांवरच अंकुश राहिला नसल्याने सहकार धोक्यात येत आहे, असा आरोप केला. तर सोसायटी व बँक वाचली तर आपले भविष्य उज्ज्वल आहे, असा विचार करून सर्वांनी एकमताने काम करण्याचे आवाहन केले.शिरीश कोतवाल यांनी आढावा बैठकीत जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांच्या समक्षच सचिवांच्या कामकाजावर तोफ डागली. सातारा जिल्हा बँकेचे सचिव १०० टक्के वसुली करतात तर मग नाशिक जिल्ह्यात का नाही, असा सवाल करीत सचिवसुध्दा शेतकऱ्यांचेच मुले असतात, मग त्यांनीही सहकार व शेतकरी जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. देसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळीकिशोर दराडे, येवल्याचे सहायक निबंधक जितेंद्र शेळके, सहायक निबंधक कांदळकर, जनरल मॅनेजर वाय. आर. शिरसाठ, शेती कर्ज व्यवस्थापक प्रभाकर ढगे, एस. वाय. बोरराडे, प्रशासन व्यवस्थापक विलास बोरसे, भदाणे आदि उपस्थित होते.
...तर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, बोनस रोखू
By admin | Updated: November 26, 2015 00:01 IST