पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्याची निर्मिती ही आपोआप झाली असून, सिंहस्थ कुंभमेळा कोणीही थांबवू शकत नाही. कुंभमेळ्याच्या माध्यमातून मानवता जपली जाते, असे प्रतिपादन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी केले. महंत ग्यानदास व विविध आखाड्यांच्या साधू-महंतांच्या उपस्थितीत सकाळी रामकुंड येथे विधिवत गंगापूजन करण्यात आले, त्याप्रसंगी ग्यानदास बोलत होते. सकाळी महंत ग्यानदास यांच्या प्रमुख उपस्थितीत जलभोग आरती, गंगापूजन तसेच गोदावरीला श्रीफळ वाढवून गंगेची आरती करण्यात आली. यावेळी महंत ग्यानदास पुढे म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा शांततेत साजरा करावा. पुरोहित संघ व सतीश शुक्ल यांनी पौरोहित्य केले. यावेळी उपस्थित साधू-महंतांचा सत्कार करण्यात आला. या गंगापूजन सोहळ्याला महंत नवीनदास, रामशरणदास, नरसिंहदास, स्वामी संविदानंद सरस्वती, महंत भक्तिचरणदास, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय कसबे, आमदार नितीन भोसले, महापौर अॅड. यतिन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती अॅड. राहुल ढिकले, माजी महापौर दशरथ पाटील, शशिकांत जाधव, योगेंद्र गोसावी आदिंसह दिगंबर, निर्वाणी व निर्माेही आखाड्याचे साधू-महंत उपस्थित होते. (वार्ताहर)
.कुंभमेळ्यातून जपली जाते मानवता
By admin | Updated: August 1, 2014 01:07 IST