मुसळगाव : सिन्नर तालुक्यातल्या मुसळगाव व परिसरात वारंवार विस्कळीत होणार्या वीजपुरवठ्यामुळे शेतकर्यांसह नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीकडे चौकशी केल्यावर वीजपुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात वीजपुरवठा गेल्या पंधरा दिवसांपासून रात्रीच्या वेळी खंडित होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मुसळगाव परिसरातील वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून भुरट्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहेत. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यावर चोरटे अंधाराचा फायदा घेत चोर्या करीत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. वीज वितरण कंपनीने या भागातील वीजपुरवठा खंडित करूनये, अशी मागणी अनेकदा करूनही त्याकडे वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मुसळगाव परिसरात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने या भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. पाणी नसल्याने विजेची मागणी कमी झाली आहे, असे असतानाही वीजपुरवठा खंडित केला जात आहे. येथे सिंगलफेज योजना यापूर्वी कार्यान्वित करण्यात आली आहे. येथील भुरट्या चोर्या रोखण्यासाठी सध्या रात्रीच्या वेळी सिंगलफेज योजनेचा पुरवठाच खंडित होत असल्याने वीज कंपनीने त्यातील त्रुटी दूर करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली आहेत. (वार्ताहर)
मुसळगावच्या विस्कळीत वीजपुरवठ्याने ग्रामस्थ हैराण
By admin | Updated: May 24, 2014 12:10 IST