नाशिक : आंबेडकरी चळवळीत भीमगीतकारांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे महत्कार्य या गीतकारांनी केले आहे. त्यांच्यामधील त्याग, समर्पण यातूनच ही चळवळ समृद्ध झाली. या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आता नव्या पिढीवर आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी केले. गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि.९) ब्ल्यू लायन फाउंडेशन आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय भीमोत्सवात उद्घाटक म्हणून डॉ. कांबळे बोलत होते. याप्रसंगी डॉ. कांबळे पुढे म्हणाले की, कोणतीही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी कार्यकर्त्यांचा त्याग, समर्पण महत्त्वाचा असतो. आंबेडकरी चळवळीला ऊर्जा देण्यासाठी गेल्या ५0 वर्षात भीमगीतकार, आंबेडकरी शाहीर आणि जलसाकार यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आंबेडकरी चळवळ शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्यासाठी या कलावंतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करून परिवर्तनाची चळवळ वेगवान केली आहे. सत्यशोधकी जलसाचा वारसा स्वीकारून आंबेडकरी जलसाने मनोरंजनाऐवजी अंधश्रद्धेवर प्रहार करीत समाज प्रबोधनाचे कार्य केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कवी अविनाश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. गंगाधर अहिरे होते. याप्रसंगी प्रा. अहिरे यांनी मनोगतात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाच्या निमित्त आंबेडकरी बाण्याचे कवी व शाहीर यांच्या चळवळीतील योगदानाला उजाळा देण्यासाठी या भीमोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानिमित्ताने या कार्याला एकप्रकारे नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे. याप्रसंगी उद्घाटन सत्रात बुद्धभूषण साळवे यांच्या बाजार या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास नितीन भुजबळ, अजित अभंग, कैलास दाभाडे, कविता थोरात आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जयश्री बागुल व किशोर शिंदे यांनी केले. प्रमोद पवार यांनी आभार मानले.
भीमोत्सवात उमटला चळवळीचा इतिहास
By admin | Updated: April 10, 2017 01:43 IST