लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बुधवारी सायंकाळी जोरदार बसरलेल्या मुसळधार पावसाने नाशिककरांना अक्षरश: झोडपून काढले. अवघ्या दीड तासात झालेल्या पावसामुळे शहर जलमय झाले. सराफ बाजारात थेट नदीप्रमाणे पाणी वाहिल्याने अनेक दुचाकी वाहून जाता जाता वाचवल्या. दीड ९२ मिलिमीटर म्हणजेच अतिवृष्टी झाल्याची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे.५ वाजेच्या सुमारास विजेच्या लखलखाटासह जोरदार पाऊस सुरू झाला आणि पावसाचा वेग वाढल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये शहराच्या विविध भागात पाण्याची तळी साचली होती. सराफ बाजार, कापडपेठेतील दुकानांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीचे स्वरूप झालेल्या प्रवाहात अनेक विक्रेत्यांचे साहित्य वाहून गेले, तसेच दुचाकी वाहून जाताना त्या पकडण्यात आल्या. बुधवार हा नाशिकच्या आठवडे बाजाराचा दिवस असल्याने ग्रामीण भागातून आलेले विक्रेते आणि शेतकऱ्यांची धावपळ झाली. काहींना भाजीपाला तेथेच टाकून पळावे लागले. तर काहींचे पैशांचे गल्ले वाहून गेल्याचे सांगण्यात आले. पावसामुळे शहरच्या बहुतांशी भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून व्यापारी संकुलांमध्ये शिरले. शरणपूररोड, केटीएचएम कॉलेज समोरसह अनेक पाणी ठिकाणी साचल्याने रस्ते अनेक रस्त्यांवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली. काही भागात पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि सुमारे एक ते दोन तास वाहतूक खोळंबली होती. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. जिल्हा न्यायालयात वृक्ष कोसळून एक मुलगा जखमी झाला. तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटने पथदीपांनी पेट घेतला होता. शहरात वीजपुरवठा खंडित झाला असून तो सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
नाशकात जोरदार पाऊस
By admin | Updated: June 15, 2017 00:04 IST