नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी (दि.२९) एकूण ३९७८ इतक्या रुग्णांची वाढ झाली तर सुमारे दीडपट अधिक म्हणजे ६२०७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३८ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ३४५७ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २०७९, तर नाशिक ग्रामीणला १७९६ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात ३७ व जिल्हाबाह्य ६६ रुग्ण बाधित आहेत. तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ९, ग्रामीणला २५ , मालेगाव मनपा ४ असा एकूण ३८ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा हतबल ठरली आहे. गत पंधरवड्यापासून मृतांची संख्या सातत्याने तीसहून अधिक राहिली आहे. तरीदेखील नागरिक निर्बंधांबाबत तितकेसे दक्ष दिसून येत नसल्याने अजून कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे चित्र जाणवत आहे.
इन्फो
उपचारार्थी ४२ हजारांवर
जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक आली आहे, त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या एकूण उपचारार्थी रुग्णांची संख्या ४२३१३ वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यात २३ हजार ४४४ रुग्ण नाशिक मनपा क्षेत्रातील, १६ हजार ८५९ रुग्ण नाशिक ग्रामीणमधील, १ हजार ७०८ मालेगाव मनपा क्षेत्रातील, तर जिल्हाबाह्य ३०२ रुग्णांचा समावेश आहे.
इन्फो
प्रलंबित अहवालात पुन्हा वाढ
गत महिन्यापासून दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात सातत्याने प्रलंबित अहवालांची संख्या मोठी राहत होती. मात्र, गत रविवारपासून प्रलंबित अहवालांची संख्या पूर्वीच्या तुलनेत काहीशी कमी होऊ लागली होती. मात्र, बुधवारपासून पुन्हा प्रलंबित अहवाल वाढू लागले आहेत. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणचे ५७१८ असून नाशिक मनपा क्षेत्रातील २७४२, तर मालेगाव मनपाचे ४१५ अहवाल प्रलंबित आहेत.