सिन्नर : किमान वेतन लागू करावे यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या व ग्रामसेवक संघटनेच्या सकारात्मक चर्चेअंती दिलेल्या लेखी आश्वासनानंतर करण्यात आली.ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निर्णय होत नसल्याने राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी उपोषणास प्रारंभ करण्यात आला होता. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र त्याबाबतचे आदेश ग्रामसेवकांपर्यंत प्राप्त झाले नव्हते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी जाहीर झालेले किमान वेतन लागू करण्याबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेने लेखी पत्र दिले.ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गिरी, पंचायत समितीचे सभापती यांच्यासह ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांची बैठक झाली. किमान वेतन व विशेष भत्त्यासह सुधारित वेतन थकबाकीसह देण्यात यावे, रिक्ते पदे भरण्यात यावी, कर्मचाऱ्यांना सर्व रजेचे लाभ मिळावेत, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना आठ तास काम देण्यात यावे, साप्ताहिक सुटी मिळावी आदिंसह सुमारे पंधरा मागण्यांवर चर्चा झाली.पंचायत समितीचे सभापती बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बर्डे, नामदेव पावसे यांना सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी सचिव मुरलीधर माळी, उपाध्यक्ष अण्णा महानुभाव, देवीदास कुटे, सुरेश कहांडळ, रवींद्र वाजे आदिंसह तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण आश्वासनानंतर मागे
By admin | Updated: August 21, 2014 00:13 IST