त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकला पाण्याचे स्त्रोत कायम राहावेत यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानात १८ गावांचा समावेश आहे. समितीमार्फत जमिनीत कायम ओलावा राहावा यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना करणे सुरू आहे. यामध्ये दगडी बांध, शेततळे, वनतळे, सीमेंट बंधारे, वृक्ष लागवड (सामाजिक वनीकरण अंतर्गत) आदि उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत.त्र्यंबकला त्यानुसार एक आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार निधी खर्च करण्यात येणार आहे. तथापि अद्यापपावेतो निधी आलेला नाही. आराखडा मंजूर झाला म्हणजे निधी मंजूर करणे होय. यासाठी सुमारे २२ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.मंजूर आराखड्याप्रमाणे भागओहळ, बेळे, देवडोंगरा, देवडोंगरी, तोरंगण (हरसूल) कळमुले (त्र्यंबकेश्वर), कळमुले (त्र्यंबक), ब्राह्मणवाडे, गणेशगाव, मुळेगाव, हिरडी, खरशेत, सामुंडी, देवगाव, टाके देवगाव, गावठा, मुरंबी, ठाणापाडा या गावांचा समावेश करण्यात आला आहे. समितीची नुकतीच बैठक प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सचिव तालुका कृषी अधिकारी अभय फलके, तहसीलदार नरेशकुमार बहिरम, गटविकास अधिकारी प्रमिला जाखलेकर, सामाजिक वनीकरण, लघुसिंचन (जलसंधारण विभाग - जि. प. नाशिक), भुजल सर्वेक्षण व जलसंपादन विभाग आदि यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा समिती सदस्य म्हणून समावेश आहे. या सदस्यांनी सर्व कामांची पाहणी करून कामे पूर्ण करून घ्यायची आहेत.(वार्ताहर)
शासनाचे जलयुक्त शिवार अभियान त्र्यंबकच्या १८ गावांचा समावेश
By admin | Updated: March 3, 2015 00:52 IST