कसबे सुकेणे : गोदावरी व दारणा धरणातून विसर्ग करण्यात आलेल्या पूरपाण्यानंतर नांदूरमधमेश्वर धरणाचे दरवाजे उशिरा उघडल्यामुळेच गोदाकाठची संपूर्ण शेती पुराच्या पाण्याखाली गेली, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, असल्याचा आरोप चांदोरी व गोदाकाठच्या ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या दारणा व गंगापूर धरण व दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार जोरदार पाऊस झाल्याने गोदावरी, दारणा व बाणगंगा या नद्यांना मोठा पूर आला होता. दारणा व गंगापूर धरणातून एकाचवेळी करण्यात आलेल्या विसर्गामुळे चांदोरी सायखेड्यासह गोदाकाठावर पूरपरिस्थती निर्माण होऊन द्राक्षबागा व पिके पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, या पूरपरिस्थितीला गंगापूर, दारणा व नांदूरमधमेश्वर धरणाच्या प्रशासनाच्या असमन्वय जबाबदार असून नांदूरमधमेश्वर धरणाचे दरवाजे उशिरा उघडल्याने गोदेच्या पुराचा फुगवटा हा गोदाकाठाच्या चाटोरीपर्यंत राहिला. त्यामुळे काठालगतची शेती पुराच्या पाण्याखाली गेली असल्याचे चांदोरी येथील सुरेश भोर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी करून तसेच प्रतिकुल हवामानावर मात करीत या भागात द्राक्षबागा जगविल्या असताना पाटबंधारे जलसंपदा खात्याच्या परस्पर असमन्वयामुळेच गोदाकाठावर पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याचे सुरेश भोर, चांदोरीचे उपसरपंच पुष्कर हिंगणे, मधुकर भोर, सोमनाथ गडाख, बाळू शेटे आदिंसह चांदोरी, चाटोरी, सायखेडा, शिंगवे, नागापूर भागातील शेतऱ्यांनी केली आहे. बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मौजे सुकेणे शिवारातही शेतीचे नुकसान झाले आहे. मौजे सुकेणे गावाच्या शिवारात असलेल्या बाणगंगा नदीवरील वसंत बंधारा पुरामुळे वाहून गेला आहे. शासनाने हा बंधारा पुन्हा बांधून परिसरातील जलसिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही मौजे सुकेणेचे उपसरपंच विजय मोगल व ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे केली आहे.जलसंपदा विभागाच्या गलथान प्रशासकिय असमन्वयामुळे गोदाकाठावर मानव निर्मीत पुरपरिस्थीती निर्माण झाली आहे. शेतक-यांचे लाखोंचे नुकसान झाले असुन शासनाने गोदाकाठाच्या पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. - सुरेश भोर, शेतकरी , चांदोरी बाणगंगेला आलेल्या पुरामळे मौजे सुकेणे गावाच्या शिवारातील वसंत बंधारा वाहुन गेला आहे. त्यामुळे शेकडो क्युसेक पाणी वाहुन जात असुन शासनाने हयाठिकाणी नवा बंधारा बांधण्याविषयी पाउले उचलावी. - विजय मोगल, उपसरपंच मौजे सुकेणे
गोदाकाठाची शेती पाण्याखाली
By admin | Updated: August 8, 2014 00:57 IST