नाशिक : झांज, टाळ, घंटीच्या गजरात आणि ‘सोनपावलांनी या, वाजतगाजत या’ आवाहनासह ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींचे रविवारी (दि.१२) घरोघरी आगमन झाले. काही घरांमध्ये पाटावर, काही ठिकाणी उभ्या गौरी, काही ठिकाणी बिनहाताच्या, कुठे खड्यांच्या गौरी, कुठे माठावर, कुठे हंडा-कळशीवर बसविल्या जात असल्याने परंपरेनुसार घरांमध्ये गौराईच्या आगमनाने माहेरवाशीण घरी आल्यासारखे आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.
गणरायापाठोपाठ तीन दिवसांसाठी येणाऱ्या या माहेरवाशिणींच्या आगमनासाठी महिलावर्गाची सकाळपासूनच प्रचंड झुंबड उडाली होती. सकाळी लवकर घरातील देवांची आणि गणरायाची पूजा करून गौरींचे आवाहन करण्यात आले. गौरीच्या मुखवट्यांना वाजतगाजत घरातील तुळशी वृंदावनासमोर ठेवून पूजन केल्यानंतर गौरींना गणरायाच्या मूर्तीजवळ स्थानापन्न करण्यात आले. तीन दिवसांची माहेरवाशीण म्हणून अनेक घरांमध्ये येणाऱ्या गौराईचे स्वागत करण्यासाठी विशेषत्वे महिलावर्गात मोठे उत्साहाचे वातावरण होते. गौरीसाठी आणलेल्या पारंपरिक, काठापदराच्या, भरजरीच्या, आकर्षक रंगांच्या विविध नक्षीकाम असलेल्या विशेष साड्या नेसवून अंगावर विशेष दागदागिने घालून मूर्ती विराजमान करण्यात आल्या. तसेच भरजरी साड्या नेसलेल्या गौरींना मंगळसूत्र, नथ, कमरपट्टा, राणीहार अशा विशेष दागिन्यांनी सजविण्यात आले. गौरी सजावटीसोबत समोर मांडण्यात येणाऱ्या पदार्थांचेही महत्त्व असते. त्यामुळे घरोघरी तीन-चार दिवसांपासून करण्यात आलेले लाडू, करंजी, अनारसा, चिवडा, चकली अशा फराळाच्या पदार्थांचीही डब्यांमध्ये किंवा काचेच्या बंद बाऊलमध्ये मांडणी करण्यात आली. गौरी ज्या मखरात उभ्या केल्या जातात ते सजवून गौरींच्या पुढे त्यांचा संसार मांडला जातो. तसेच त्यांच्यापुढे अनेक धान्यांच्या राशी मांडलेल्या असतात. गौरी बसविण्याच्या पद्धती तसेच अनेक घरांमधील चालीरीती विभिन्न असल्या तरी गौराईबाबतचा उत्साह दिसून येत होता.
इन्फो
सोमवारी गौरींचे विशेष भोजन
गौरी आल्यानंतर त्यांना पहिल्या दिवशी भाकरी आणि पालेभाजीचे भोजन दिले जाते. दुसऱ्या दिवशी गौरींसाठी नैवेद्याचा विशेष बेत असतो. त्यात १६ भाज्या, विविध प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी आणि पंचामृतासह पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी फराळ आणि आरती केली जाते. त्याशिवाय १६ पदरी दोऱ्यांचे पोते, वस्त्रमाळा अर्पण करून सोळा काडवाती व पंचारतीने आरती करण्याचीही परंपरा आहे.
इन्फो
तिसरा दिवस हा विसर्जनाचा असतो. विसर्जन करण्याआधी प्रत्येक घरी महिलांकडून हळदी-कुंकवाचे आयोजन केले जाते. गौरींचे मुखवटे हे अनेक घरांमध्ये आता ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चे तर काही ठिकाणी ते पितळी असल्याने त्यांच्या मुखावरील तेज दिवसागणिक वाढते. तसेच त्यांच्यापुढे ठेवलेल्या धान्याची रासदेखील वाढते. त्यामुळे ते धान्य घरातील कोठारात ठेवल्यास समृद्धी कायम राहते, अशीदेखील भाविकांची श्रद्धा असते.