नाशिक : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाणीपुरवठा योजनांचे व टंचाई राबविण्यात आलेल्या गावांमधील योजनांचे उपयोगिता प्रमाणपत्र जमा करण्यासाठी काल (दि.४) मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी जिल्'ातील नऊ गटविकास अधिकाऱ्यांसह उपअभियंते व शाखा अभियंत्यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सन-२००९-१० पासूनचे २०१३-१४ पर्यंतच्या आर्थिक वर्षातील एकूण राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना, त्यावर झालेला खर्च, या काळात टंचाई कृती आराखड्यानुसार राबविण्यात आलेल्या योजना व त्यावरील खर्च यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी ज्या तालुक्यात उपयोगिता प्रमाणपत्र जास्त संख्येने प्रलंबित राहिलेले होते. त्या गटविकास अधिकाऱ्यांना सुखदेव बनकर यांनी याबाबत जाब विचारला. तसेच काही गटविकास अधिकाऱ्यांनी जागेवरच प्रलंबित उपयोगिता प्रमाणपत्र दिले, तर काहींनी आक्षेप नोेंदविलेल्या खर्चाच्या पावत्या सादर केल्या. आता ही उपयोगिता प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केल्यानंतरच जिल्हा परिषदेला टंचाई संदर्भात निधी वितरीत केला जाणार आहे. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जिल्हा परिषदेला टंचाईचा निधी हवा असेल तर आधीच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे हजर करण्यास सांगितल्याचे समजते. त्यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रांचा विषय मार्गी लावल्याचे समजते. (प्रतिनिधी)
प्रमाणपत्रावरून गटविकास अधिकाऱ्यांची ‘हजेरी’
By admin | Updated: July 5, 2015 00:54 IST