नाशिक : गोदापात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेला गंगापूर येथील भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, या भूखंडापोटी १४ कोटी ३६ लाख रुपये मोबदला म्हणून जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यासाठी गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत नाले आणि अन्य रासायनिक पाणी सोडले जात असल्याने प्रदूषण होत आहे. त्यामुळे गंगापूर गाव परिसरातील गटारींचे पाणी थेट नदीपात्रात न सोडता त्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने याच भागात सर्व्हे नंबर २ (पै.) व ३ (पै.) क्षेत्र ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. जागामालकाने त्यास विरोध केला आणि हे प्रकरण न्यायालयात नेले. यासंदर्भात उच्च न्यायालयाने भूसंपादन प्रस्तावाबाबत सहा महिन्यांच्या आत म्हणजेच ७ सप्टेंबरपर्यंत निवाडा करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार हालचाली करण्यात आल्या आणि सुधारित प्रारूप निवाड्यानुसार या जागेचा मोबदला म्हणून १४ कोटी ३६ लाख ९८ हजार ५७० इतकी रक्कम तातडीने जमा करण्यासाठी हा प्रस्ताव आहे. महापालिकेने भूखंडासाठी मोबदला म्हणून नऊ कोटी ११ लाख ६४ हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे महापालिकेला हा भूखंड २३ कोटी ४८ लाख ६२ हजार ५७० रुपयांना पडणार आहे. (प्रतिनिधी)