सतर्कता :दसक गोदाघाटाच्या विस्तारीकरणामुळे निर्बंध; नांदूर घाटाचा पर्याय
नाशिकरोड : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जेलरोड दसक गोदावरी घाटाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी यावर्षी श्री गणेशमूर्ती विसर्जन करता येणार नाही. त्यामुळे भाविकांना नांदूर घाटावर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करावे लागणार आहे.देवळालीगाव येथील वालदेवी नदीपात्रात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यामुळे जेलरोड दसक येथे गोदावरी नदीचे पात्र व घाटदेखील मोठा असल्याने गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविक प्राधान्य देतात. घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या हजारो मूर्तीचे दसक गोदावरी नदी पात्रात विसर्जन होते. घाटाचे विस्तारीकरणसिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाकडून दसक गोदावरी नदीकिनारी घाटाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या ज्या ठिकाणी घाट बांधला आहे त्या ठिकाणी भाविकांना अंघोळ सहजरीत्या करण्यात यावी म्हणून नदीपात्रात आणखीन सहा पायर्या बांधल्या जात आहे. तसेच नदीपात्राच्या किनारी जेथे घाट बांधलेला नाही तेथे घाट बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे घाटालगतच नदीपात्रात मोठमोठे खड्डे करण्यात आले असून, घाटाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. अपघात टाळण्यासाठी..दसक गोदाघाटावर गणरायाच्या मूर्ती विसर्जनासाठी भाविकांची गर्दी होते. घाटाचे कामामुळे काही दुर्घटना घडू नये म्हणून यंदाच्या वर्षी दसक गोदाघाटावर श्री गणरायाच्या मूर्ती विसर्जनासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, नगरसेवक अशोक सातभाई, विभागीय अधिकारी किशोर चव्हाण, बांधकाम उपअभियंता नीलेश साळी, कनिष्ठ अभियंता विशाल गरुड यांनी आज संयुक्तरीत्या पाहणी करून दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यामुळे यंदा गोदावरी नदीच्या पलीकडच्या नांदूर तीरावरील घाटावर मूर्ती विसर्जन करण्यासाठी जावे लागणार आहे.
पुलावरील खड्डे बुजवून डांबरीकरणाची गरज
■ जेलरोड येथील श्री संत जनार्दन स्वामी पुलाच्या रस्त्याची प्रचंड वाताहत झाली असून, सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत त्या ठिकाणाहून वाहने चालवावी लागतात. विसर्जनासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मनपा प्रशासनाने सर्वप्रथम श्री संत जनार्दन स्वामी पुलावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याची गरज आहे.
(प्रतिनिधी)