नाशिक: अध्यक्ष व उपाध्यक्षांइतकेच जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतींना महत्त्व असते. विषय समित्यांवर भाजपा-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याने खऱ्या अर्थाने विकासाला गती येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.शुक्रवारी (दि.७) मुंबईच्या सह्णाद्री अतिथीगृहावर पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी भाजपा-राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत चमत्कार करीत भाजपा-राष्ट्रवादी कॉँग्रेसने शिवसेना व कॉँग्रेसकडून सत्ता खेचून आणली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सभापती यतिन पगार, मनीषा पवार, अपर्णा खोसकर, सुनीता चारोस्कर यांच्यासह पंचायत समित्यांमध्ये भाजपाच्या सभापतिपदी निवड झालेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. राहुल अहेर, आमदार अपूर्व हिरे, माजी आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, भाजपा गटनेता डॉ. आत्माराम कुंभार्डे, राष्ट्रवादीचे गटनेता उदय जाधव, भाजपा, राष्ट्रवादीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही
By admin | Updated: April 9, 2017 00:48 IST